8 जणांचा मृत्यू,150 जनावरे दगावली, 67 गावाचा संपर्क तुटला
| छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी |
मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला. मराठवाड्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली असून, पावसाने अनेकांचे जीव घेतले आहेत. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाने कहर केला. पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर व बोटींच्या साह्याने स्थलांतरित केले जात आहे. पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे. तसेच, शुक्रवारनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत दीडपट जास्तीचा पाऊस झाल्यामुळे जोमात आलेले खरीप हंगामातील पीक आडवे झाले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत 5 हजार 320 गावांतील पिकांचा चिखल केला. आठवडाभरापासून सुरू असल्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली आहे. सोबतच जीवितहानीही झाली आहे.
मराठवाड्यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. त्यात जिल्ह्यातील लातूर 3, धाराशिव 1, बीडमधील दोन तर नांदेडमध्ये एक जणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात एकूण लहान-मोठी 150 जनावरे दगावली. त्यात संभाजीनगर जिल्ह्यात 5, जालना 15, परभणी जिल्हात 6, हिंगोलीमध्ये 6, नांदेड जिल्ह्यात 9, बीड जिल्ह्यात 63, लातूर जिल्ह्यामध्ये 7, धाराशिव जिल्ह्यातील 21 जनावरांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 11 गावांचा संपर्क तुटला तर जालना जिल्ह्यात 2 गावाचा, परभणी जिल्ह्यात 30 तर लातूर 20 गावाचा संपर्क तुटलेला आहे. पुरामध्ये सध्या अडकले लोकांची संख्या 214 आहे. ज्यामध्ये जालना 35 बीड 29 धाराशिव 150 नागरिकांचा समावेश आहे. मराठवाड्यात 548 लोकांना स्थलांतरित केले. ज्यामध्ये जालना 90 बीड 442 धाराशिव 150 इतक्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आली आहे. परभणी, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा तीन तुकड्या आर्मीच्या तैनात करण्यात आल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यात आर्मी बचाव काम करते आहे, तर परभणी आणि बीडमध्ये काही वेळात आर्मी पोहोचणार आहे. एनडीआरएफ देखील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. त्यांच्याकडून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाघेगव्हाण 150 लोक पुरात अडकले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ आणि आर्मीचे प्रयत्न सुरू आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात जवळपास बाराशे मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक मंडळामध्ये दुबार, तिबार अतिवृष्टी झाली आहे. 17 सप्टेंबरपर्यंत 18 लाख 27 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तर 18 सप्टेंबरपासून ते रविवार पर्यंत 4 लाख 91 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत जुलै ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाई च्या मदतीपोटी 696 कोटी मिळाले आहेत. तर 721 कोटी मिळावेत यासाठी विभागीय आयुक्त कार्यावरून प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. विम्यातून मदत मिळणार तातडीची मदत मिळणार नाही. पीक कापणीच्या प्रयोगानंतर विमा मिळणार असल्याचं सांगितलं जातं आहे.
