अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पावसाने धूमशान घातले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होत जोरदार कोसळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अर्लट दिला आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सुखावले. मात्र, या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते, पूल, पाण्याखाली गेले. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. नदी, नाले पाण्याने ओसंडत वाहत होते. पूरजन्यपरिस्थिती निर्माण झाली होती. दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली. अलिबाग, तळा, महाड, रोहा, पोलादपूर, म्हसळा या तालुक्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यात काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली होती. लावणीचा हंगाम सुरू झाला होता. परंतु, शेतामध्ये पाणी नसल्याने लावणीची कामे खोळंबली होती. पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर पाऊस सोमवारपासून सुरू झाला. घाटमाथ्यावर मध्यम व व तुरळक स्वरुपाचा पाऊस पडला. सावित्री अंबा, कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे सर्व शासकिय यंत्रणांना व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.
पावसात मंगळवारी सकाळी अलिबाग-तळा मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली. अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी महाड शहरामध्ये शिरले. रावढळ पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. विन्हेरी येथील नागेश्वरी नदीमध्ये तुडूंब पाणी भरले. गावातील मल्लिकार्जून मंदिराजवळील पुलावरून वाहू लागले. महाडमधील रायगडकडे जाणाऱ्या दस्तुरी मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला. अलिबाग शहरातील पीएनपी नगर, अलिबाग एसटी स्थानक परिसर पाण्याने भरला. त्यामुळे प्रवाशांसह चालकांचेदेखील प्रचंड हाल झाले.

भिसेखिंडीमध्ये दरड कोसळून डोंगरावरचे झाड रस्त्यावर उन्मळून पडले. जेसीबीच्या सहाय्याने झाड बाजूला काढण्यात आले. रोहा-भालगाव या रस्त्यावर तांबडी, भिसेखिंड, मेढा, महाळुंगे, कुंभोशी या ठिकाणी माती रस्त्यावर आली आहे. रोहा तालुक्यातील वरसे, भुवनेश्वर या परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. महादेवखारमध्ये दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. आंबेवाडी नाका कोलाड नाक्यावर दुकानांमध्ये, शिरवली गावांमध्येपाणी शिरले असून, नागोठणे येथील चिकणी ते रेल्वे पुलापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
पोलादपूरमधील आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. वाहनांचे नुकसान होऊ नये, म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भोराव, सवाद, धारवली, मुख्य रस्त्यावर, माटवन येथे पाणी भरल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. ओंबळी येथे घरांजवळ माती घसरली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. म्हसळा येथील ढोरजे येथील नदीच्या पुलावरून पाणी वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पावसात अनेक भागातींल पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक सेवा बंद केली. त्याचा फटका विद्यार्थी, व अन्य प्रवाशांना बसला आहे.
सावित्री, कुंडलिका धोका पातळीवर
सावित्री आणि कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्या भागात अलर्टचा इशारा दिला आहे. रोहामध्येदेखील जोरदार पाऊस आहे. जिल्ह्यातील महाडमधील सावित्री नदीमध्ये 6.60 मी. रोहामधील कुंडलिका 24.25 मीटर इतकी पाण्याची पातळी वाढली आहे. या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोहामधील आंबा नदीमध्ये 8.70 मी., खालापूरमधील पाताळगंगा नदीमध्ये 19.55 मी., कर्जतमधील उल्हास नदीमध्ये 44.35 मी. पनवेलमधील गाढी नदीमध्ये 3.05 मी. इतका पाण्याचा साठा आहे. अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली असून, उल्हास, गाढी, पाताळगंगा नदयांमध्ये इशारा पातळीपेक्षा कमी पाणी असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली आहे.
रामराज पाण्याखाली
जिल्हयात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक नद्या, नाले, पाण्यांनी भरून गेले. तालुक्यातील रामराज नदीतील पाणी रामराज बाजारपेठांसह गावात शिरले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड झाले. रामराज-बोरघर या गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते. रोहावरून अलिबागकडे येणाऱ्या जाणाऱ्या बस सेवा फक्त बोरघर फाट्यापर्यंत सोडण्यात आल्या. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. शाळा, महाविद्यालयात गेलेल्या विद्यार्थी, नागरिक, महिला पुलाच्या अलिकडे अडकली होती. रामराज येथील सोहम वागळे यांच्यासह काही तरुणांनी पुढाकार घेत अडकलेल्या विद्यार्थ्यांसह नागरिक, महिलांना सुखरूप त्यांच्या निश्चित स्थळी सोडले.
धरणांमध्ये 91 टक्के जलसाठा
कोलाड येथील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये 91टक्के जलसाठा आहे. 28 धरणांपैकी 22 धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा आहे. उर्वरित अलिबाग तालुक्यातील श्रीगाव, श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली या दोन धरणांमध्ये 50 टक्के, श्रीवर्धनमधील कार्ले, उरणधील पुनाडे या दोन धरणांमध्ये 75 टक्के, श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी, कर्जत येथील साळोख धरणांमध्ये 99 टक्के जलसाठा असल्याची माहिती लघू पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.











