महानिर्मितीची ऐतिहासिक कामगिरी

27 औष्णिक संचांमधून वीजनिर्मिती साध्य
। मुंबई । प्रतिनिधी ।
27 एप्रिल रोजी महानिर्मितीच्या इतिहासात एक अनमोल कामगिरी साध्य झाली आहे. राज्यामध्ये सातत्याने वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र येथील सात औष्णिक संच, कोराडी येथील चार संच, तसेच नाशिक, भुसावळ व परळी येथील प्रत्येकी तीन संच, खापरखेडा येथील पाच संच व पारस येथील जोन अशा एकूण 27 औष्णिक संचामधून लक्षणीय वीजनिर्मिती सुरु आहे. सर्वच्या सर्व 27 औष्णिक संचांमधून वीजनिर्मिती सुरु असण्याची महानिर्मितीच्या सुमारे 60 वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. राज्यातील विजेच्या वाढत्या मागणीच्या पाश्‍वर्र्भूमीवर मुख्यमंत्री तसेच ऊर्जा मंत्री यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार महानिर्मितीने मिशन 8000 मेगावॅट हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानुसार सद्य:स्थितीत आपले सर्व संच कार्यरत कसे राहतील याकडे प्रकर्षाने लक्ष दिलेले असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संचांच्या उपलब्धतेकडे विशेष भर दिला आहे. त्याचप्रमाणे औष्णिक संचांच्या देखभाल-दुरुस्तीच्या वेळापत्रकाचेही काटेकोर नियोजन साध्य केलेले आहे. कोळसा टंचाईच्या विपरीत परिस्थितीत महानिर्मितीच्या वरिष्ठ व्यवस्थापन अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नातून ही कामगिरी साध्य झाली आहे. हा विक्रमी टप्पा गाठल्याबद्दल उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांचे व महानिर्मितीच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version