बालगंधर्व येथे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
| पाली/बेणसे | वार्ताहर |
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा 2023 अंतर्गत पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन रिलायन्स नागोठणे बालगंधर्व रंगभवन येथे करण्यात आले. जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई यांचा वारसा त्या समर्थपणे पेलत आहेत. आपल्या कार्याद्वारे विविध क्षेत्रात ठसा उमटवत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
सन्मानित करण्यात येणाऱ्या नवदुर्गांचे कौतुक करताना ते म्हणाले की, पोलीस दलात देखील विविध पदांवर कार्यरत राहून आमच्या महिला भगिनी उत्तम कामगिरी बजावत असून त्या दुर्गामातेचा अवतार आहे. मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम होतील असा उपक्रम व प्रशिक्षण पोलीस दलाने राबवावा त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ तसेच बचत गटांच्यासाठी काम करणाऱ्या महिला समन्वयकांना रत्नागिरी जिल्ह्याच्या धर्तीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोबाईल फोन देण्यात येतील ज्यामुळे त्यांचे ते काम कार्यक्षमपणे करू शकतील, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात मंत्री अदिती तटकरे यासह सामाजिक, शासकीय, पोलीस, वैद्यकीय सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 18 महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पोलीस दलात जवळपास 30 टक्के महिला असून त्या आपली जबाबदारी सक्षमतेने पूर्ण करीत आहेत. डायल 112 च्या माध्यमातून पथकाचा जिल्ह्यातील सरासरी रिस्पॉन्स टाईम सहा मिनिट आहे. शहरी व ग्रामीण दुर्गम भागात देखील डायल 112 वर कॉल प्राप्त झाल्यानंतर पथक तातडीने पोहोचते, असे त्यांनी सांगितले. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांची प्रमुख उपस्थित होती.