उभ्या ट्रेलरला कारने धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी
। नागोठणे । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठण्याजवळील सुकेळी गावच्या हद्दीत असलेल्या जिंदल कंपनीच्या समोरील महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या बलेनो कारने उभ्या असलेल्या ट्रेलरला मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. हा अपघात सोमवारी (दि.24) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातग्रस्त कार मध्ये अडकून राहिलेले व नंतर कार मधून बाहेर काढण्यात आलेले जयदीप दीपक महाडिक (36) रा. बोरीचा माळ, ता. तळा आणि स्वप्निल सुरेश साळुंखे (32) रा. इंदापूर, ता. माणगाव हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताच्या घटनेची व कार मध्ये प्रवासी अडकून राहिल्याची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे व त्यांचे सहकारी पो. ह. प्रशांत घरत, पो. ह. प्रशांत भोईर, पो.ह. महेश रुईकर पोलीस शिपाई बळी पुट्टेवाड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महामार्ग शाखेच्या सपोनी गीतांजली जगताप, सहाय्यक उपनिरीक्षक भानुदास म्हात्रे, पोलीस शिपाई सनील पाटील, पोलीस शिपाई पिंगळे, पोलीस शिपाई माळी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारचे दरवाजे तोडून आणि समोरचा भाग कापून जखमींना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या या दोघांवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पनवेल येथे नेण्यात आले.
या अपघाता संदर्भात उपलब्ध माहितीनुसार जयदीप महाडिक हा त्याच्या जवळील मारुती बलेनो कार मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे चालवीत घेऊन जात असताना काय सुकेळी येथील जिंदाल कंपनी समोर आली असता महामार्गावर उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार ठोकर दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये बलेनो कारमध्ये चालकाच्या डाव्या बाजूला बसलेले स्वप्निल साळुंखे यांचे डोक्याला, पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. अपघातातील वाहन रस्त्याचे बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
हा अपघात पहाटेच्या वेळी झाल्याने कार चालक झोपेत असावा आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे विशेषतः पहाटेच्या वेळी असे अपघात वारंवार घडतात. त्यामुळे या अवैधपणे उभ्या असणाऱ्या अवजड वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
