रायगड आपत्कालीन व्यवस्थापन कोमात
| उरण | वार्ताहर |
दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर शनिवारी (दि.27) रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे उरणमधील बहुतांश भातशेती आडवी पडली असून, रहिवाशांच्या घरांची पडझड झाली आहे. तालुक्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळित झाले असून शेतकऱ्यांना, रहिवाशांना मदतीचा हात देणारी उरण तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन मात्र, कोमात गेल्याचे चित्र रविवारी दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
परतीच्या पावसाने सध्या कोकणातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय आपत्कालीन व्यवस्थापन सतर्क झाले आहे. मात्र, उरण तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. शासकीय आपत्कालीन व्यवस्थापन हे पडझड झालेल्या चिरनेर गावातील रहिवाशांच्या घरांची पाहणी करण्यासाठी किंवा आडवी पडलेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी बांधावर न आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
उरण तालुक्यात शनिवारी आलेल्या वाऱ्याच्या पावसामुळे कापणीसाठी आलेली भात शेती आडवी पडली. घरांचीही पडझड झाली असताना शासकीय आपत्कालीन व्यवस्थापन मदतीसाठी पुढे येत नसतील तर ही शोकांतिका आहे. तरी शासनाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच उरण तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थापनाच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
संतोष ठाकूर
शेतकरी







