। हर्णै । वृत्तसंस्था ।
आंजर्ले खाडीतील साचलेला गाळ काढण्याचा रखडलेला प्रस्ताव मंजूर होऊन निधी आलेला असताना अजून कामाला सुरुवात होत नाही. शासनाला अजून किती नौकांची जलसमाधी बघायची आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मच्छिमार बांधवांकडून येत आहेत. रोजच्या लाखो रुपयांच्या उलाढालीमुळे हर्णै बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील क्र. 2 चे बंदर समजले जाते. अजूनही हे बंदर पूर्णपणे सुरक्षित बंदर नाही. इथला कित्येक वर्षे मागणी असलेला जेटीचा प्रस्ताव अजूनही सरकार दरबारी धूळ खात आहे. त्यामुळे हर्णै या गावासह, पाजपंढरी, आडे, उटंबर, केळशी, बुरोंडी, दाभोळ, कोळथरे आदी गावातील मच्छिमार व्यावसायिकांच्या किमान 850 परवानाधारक नौकांना वातावरणाच्या बदलामुळे उद्भवणार्या चक्रीवादळाच्या काळात पावसाळ्यात दुरुस्तीच्या कारणास्तव हर्णै बंदरापासून जवळच असलेल्या आंजर्ले, अडखळ खाडीत सुरक्षित शाकारण्यासाठी घेऊन यावे लागते.
आंजर्ले खाडीच्या मुखावरच प्रचंड गाळ साचला आहे. खाडीच्या मुखावरचा भाग गाळाने भरला असल्यामुळे नौका खाडीत आणताना या मच्छिमारांना तारेवरची कसरत करावी लागते. ही कसरत करतानाच गेल्या दोन वर्षात या खाडीत तीन बोटींना जलसमाधी मिळाली. दोन दिवसांपूर्वी पाजपंढरी येथील एक नौका पूर्णपणे बुडाली आणि हर्णैमधील दुसर्या दोन नौका बुडता बुडता मच्छिमार बांधवांनीच वाचवल्या. आंजर्ले खाडीतील मुखाशी असलेला गाळ निघाला असता तर दरवर्षी येथील मच्छिमार बांधवांच्या नौकांचे होणारे नुकसान थांबले असते. दरवर्षी आंजर्ले खाडीतील गाळ निघेल म्हणून सांगण्यात येत आहे. निधी मंजूर आहे मग गाळ काढण्यास घोडे आडले कुठे? असा सवाल मच्छिमार करत आहेत.