निलंबनाची कारवाई रद्द होणार
परिवहन मंत्र्यांची घोषणा
मुंबई | प्रतिनिधी |
विलिनीकरणाच्या मुद्यावरुन गेले 18 दिवस बेमुदत संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्यांना 41 टक्के पगारवाढ देण्याबरोबरच दरमहा 10 तारखेच्या आत पूर्ण पगार देण्याची घोषणा परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांनी बुधवारी(24 नोव्हेंबर) मुंबई येथे केली.तसेच संपकाळात निलंबित,कमी करण्यात आलेल्या कर्मचार्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याची हमीही सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.
सह्याद्री अतिथीगृहात संपकरी कर्मचारी संघटनांचे पदाधिकार्यांसमवेत अनिल परब यांनी दीर्घकाळ चर्चा केली.यावेळी त्यांनी कामगारांना देण्यात येणार्या भरघोस पगारवाढीचीही घोषणा केली.तसेच ही आतापर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ असल्याचाही दावा केला.या पगारवाढीने राज्याच्या तिजोरीवर 660 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचेही त्यांनी सुचित केले.यावेळी उच्च,तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आम.सदाभाऊ खोत,आम.गोपीचंद पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अशी आहे पगार वाढ
जे कर्मचारी एक वर्ष ते 10 वर्ष कॅटेगिरीत आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्यांचं वेतन 17 हजार 80 रुपये झालं आहे. ज्यांच मूळ वेतन 17 हजार होतं. त्यांना 24 हजार पगार होणार आहे. ही वाढ 41 टक्के आहे. आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे. 10 ते 20 वर्षापर्यंतच्या कर्मचार्यांच्या वेतनात 4 हजाराने वाढ केली आहे. ज्यांचा पगार 16 हजार होता. त्यांचा पगार 23 हजार 40 झाला आहे. वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार झाला आहे. 20 वर्षे त्याहून अधिक असणार्या कामगारांना 2 हजार 500 ने वाढ देण्यात येणार आहे. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजार 40 झालं आहे. ज्यांचं मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थुल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचा मुळ वेतन 39 हजार 500 होईल, तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होईल, असं त्यांनी सांगितलं.
पगार 10 तारखेच्या आतच होणार
गेल्या वर्षी करोनामुळे एसटी आर्थिक नुकसानीमध्ये होती. अशा स्थितीत देखील राज्य सरकारने एसटीला 2 हजार 700 कोटींची मदत पगारासाठी केली होती. पण काही कारणास्तव त्यांचे पगार उशिरा होत होते. यादरम्यान काही कामगारांनी आर्थिक समस्येमुळे आत्महत्या केल्या. म्हणून राज्य शासनाने त्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आधी होईल, ही हमी घेतलेली आहे. त्यामुळे एसटीच्या कामगारांचा पगार कधीही 10 तारखेच्या पुढे जाणार नाही.
विलिनीकरणाचा निर्णय समितीने दिला, तर तो आम्हाला मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंवा होईपर्यंत हा तिढा असाच कायम ठेवता येणार नाही. म्हणून कर्मचार्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही पगारवाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे. कर्मचार्यांसोबतच्या करारात दिला जाणारा डीए राज्य सरकारच्या डीएप्रमाणेच दिला जातो.
अॅड.अनिल परब,परिवहन मंत्री
सरकारी तिजोरीवर 360 कोटींचा बोजा
या पगारवाढीसाठी प्रत्येक महिन्याला 60 कोटींचा अतिरिक्त बोजा स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे महिन्याला 360 कोटींचा बोजा आम्ही घेतोय. यासाठी 750 कोटी आम्हाला मोजावे लागणार आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कामगारांनी एसटी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत.