कोर्लई | वार्ताहर |
गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरणानंतर दुपार नंतर पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे मुरुड तालुक्यातील नांदगाव-मजगांव, बोर्ली-मांडला परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी-बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.साळाव-मुरुड रस्त्यावर अनेक ठिकाणी तसेच बोर्ली स्थानकावरील रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचून वाहनचालकांना आपली वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे.
गेल्या चार दिवसांपासून विजांच्या गडगडाटासह पडत असलेल्या या अवकाळी पावसामुळे नांदगाव, मजगांव, बोर्ली, मांडला गावांसह दुर्गम ग्रामीण भागातील काही शेतकर्यांच्या शेतात कापून ठेवलेले भात पिक भिजल्याने नुकसान झाले आहे.शेतात पेरलेल्या वाल,रताळी आदी. फळभाजी-पाला व आंबा पिकावर परिणाम होण्याची भिती व्यक्त होत असून या अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी व बागायतदारांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे.