ठेकेदाराचा लेटलतीफ कारभार ग्रामस्थांच्या मुळावर
| माथेरान | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील ताडवाडी ही तालुक्यातील सगळ्यात मोठी वाडी असून, या वाडीच्या बाजूलाच मोरेवाडीदेखील आहे. ताडवाडीसाठी जलजीवन मिशन योजना संजीवनी ठरणार असल्याच्या बतावण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या योजनेतला ठेकेदाराचा संथ कारभार आदिवासी ग्रामस्थांच्या मुळावर आला असून, लघु पाटबंधारे विभाग ठेकेदाराची पाठराखण करण्यात मश्गुल असल्याचे चित्र आहे. ताडवाडी जलजीवन मिशन योजनेची मुदत मेमध्ये संपली असून, आठ दिवसांत योजना कार्यरत करणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून तब्बल दोन महिन्यांनंतर योजनेची चाचणी घेण्यात आली आहे. तर अद्याप साठवण टाकीला पाईप जोडण्यात आलेले नाही, गावात पाईप टाकण्यात आलेले नाहीत, जलशुद्धीकरण केंद्राचा पत्ता नाही, त्यामुळे या महत्त्वपूर्ण योजनेला घरघर लागली असून, आता ग्रामस्थांमधून संतापाच्या लाटा उसळत आहेत.
कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील डोंगर दुर्गम भाग असलेल्या परिसरात उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसते. तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीत ताडवाडी ही आदिवासी वाडी येते. तालुक्यातील सगळ्यात मोठी आदिवासी वाडी असून, सुमारे 900 लोकसंख्या असलेल्या या वाडीत 250 च्यावर कुटुंब राहतात.तर दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ या वाडीला बसते. त्यामुळे दरवर्षी शासनाकडून पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, तरीही पाणी पुरवठा तोकडा पडत असल्याची खंत ताडवाडी ग्रामस्थ व्यक्त करतात. उन्हाळा सरत असताना पाणी टंचाई तीव्र होते. याची दखल घेत विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय हे दिनांक 31 रोजी तत्काळ कर्जतमध्ये दाखल झाले. कर्जत तहसिल कार्यालयात दाखल झाल्यावर त्यांनी तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, निवासी नायब तहसिलदार सचिन राऊत, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुजित धनगर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या योजनेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. अशी थेट तंबी आमदार भारतीय यांनी अधिकाऱ्यांना दिली होती. तर यावेळी पुढील 8 दिवसात योजना कार्यान्वित होईल असा शब्द लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला होता.
मात्र या गोष्टीला आता 2 महिने सरत आले तरी देखील ठेकेदाराने आपला संथकारभार सुरु ठेवला आहे. सद्यःस्थितीत या योजनेच्या उद्भव विहरीत पंप सोडण्यात येऊन उद्भव विहीर ते मोरेवाडी जल साठवण टाकी व टाकी ते ताडवाडी इथपर्यंत पाईप टाकण्यात आले आहेत. तर अद्याप गावात पाईप लाईन फिरवण्यात आलेली नाही. दरम्यान, ठेकेदारांचा संथ कारभारामुळे योजना लांबट असल्याने आता ग्रामस्थदेखील आक्रमक पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दखल घेणार का?
रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासाठी जल जीवन मिशन योजना हि महत्वाची होती. त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या काळात उत्तम काम झाले. त्यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. भरत बास्टेवाड यांनी नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलाआहे. त्यामुळे ताडवाडीच्या लेटलतीफ कारभाराची डॉ. बास्टेवाड हे दखल घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ठेकेदाराने योजनेसाठी लागणाऱ्या पाइपची ऑर्डर दिली होती. मात्र, पाईप भेटण्यास उशीर झाल्याने योजना पूर्ण करण्यास विलंब लागत आहे.
डी.डी. गावित, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग, कर्जत
आम्हाला दरवर्षी सांगितले जाते पाणी येईल. मागच्या वेळी गावात नळ पण लावले होते. पण ते नळच आले फक्त, पाणी काही आलं नाही. तेव्हा सरकारच्या भरवश्यावर किती बसायचं हा प्रश्न आहे. गावात पाण्याचा त्रास असल्याने कुणी पोरी पण द्यायला तयार होत नाही. आमचा आयुष्य पाणी भरून भरून गेलं.
मीना तुकाराम आगीवले, ताडवाडी महिला ग्रामस्थ