| पनवेल | वार्ताहर |
सिडको तर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत बेलापूर ते पेंधर हा उन्नत मार्ग उभारण्यात आला आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम देखील पूर्ण झाले असून गेली चार महिने उद्घाटनाविना मेट्रो रखडली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे देशाच्या पंतप्रधानांना येथील मेट्रोच्या लोकार्पणासाठी वेळ नाही. मेट्रोमुळे येथील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मेट्रोचे लोकार्पण करून रेल्वे सेवा प्रवाशांसाठी खुली करावी अशी नागरिकांची मागणी असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या राज्यात निवडणुकांमध्ये व्यस्त असल्यामुळे मेट्रोच्या लोकर्पणाची तारीख पे तारीख अशी रखडपट्टी चालू असल्याची टीका पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी केली आहे.
बेलापूर ते पेंधर मेट्रो स्थानकांचे काम पूर्णत्वास आले आहे. सुमारे 11 किमी लांबीच्या या मार्गावर 11 स्थानके आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. मात्र याठिकाणीही राजकारण करण्याची संधी भाजप सोडत नाही. गेली चार महिने मेट्रो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. नवी मुंबईकर नागरिक देखील रेल्वे सेवेच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे मेट्रोचे महायुती सरकारने किंवा पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करावे अन्यथा काँग्रेस मेट्रोचे उद्घाटन करेल, असा इशाराही पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी दिला आहे.







