मारुती फाउंडेशनतर्फे पुस्तकपेढीचा शुभारंभ

माणगाव | वार्ताहर |

शालेय शिक्षण घेणाऱ्या इयत्ता नववी ते बारावी मधील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहाय्यभूत व्हावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या मारुती फाऊंडेशनच्या पुस्तकपेढी योजनेचा बुधवार (दि.17)  मे रोजी सायंकाळी पेण-तळे येथे शुभारंभ करण्यात आला. पुस्तकपेढी योजनेचे हे चौथे वर्ष असून यावर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून पुस्तकां बरोबर विविध शैक्षणिक साहित्याची मदत गरजूंना देण्यात येणार आहे.
या योजने अंतर्गत शैक्षणिक मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षभरासाठी पूर्णपणे मोफत पाठ्यपुस्तक संच भेट दिला जातो. वर्षभर संच वापरल्यानंतर फाउंडेशनकडे परत केला जातो. सदर संच दुसऱ्या विद्यार्थ्यांना वापरण्यास मिळतो. त्यामुळे विद्यार्थी पालकांना वेळेत पुस्तके मिळतात व खरेदी करण्याचा आर्थिक भार हलका होत आहे. आजपर्यंत गेल्या तीन वर्षात 140 हून अधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. कोरोना महामारी काळात पालक गमावलेल्या गरजू विद्यार्थी, आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असल्याने सामाजिक क्षेत्रातून या पुस्तक पेढी योजनेचे कौतुक होत आहे.
सीताराम पोटले, राजेश भावे, भागोजी पोटले, अनिल निंगावले, विनायक पोटले, काशिराम कालप, प्रवीण पोटले, अजित शेडगे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतून 175 विद्यार्थी शैक्षणिक मदतीचा लाभ घेतील असा विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष अजित शेडगे यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version