वाशी ग्रामपंचायत निवडणुकीत ‘इंडिया आघाडी’चे वर्चस्व

| हमरापूर | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाशीच्या निवडणुकीकरिता शिवसेना ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या माध्यमातून इंडिया आघाडीचे वर्चस्व राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडिया आघाडीतर्फे सरपंचपदाकरीता उभे असलेले संदेश शंकर ठाकूर व अन्य सदस्यांची प्रचारात मोठी आघाडी असून येथे इंडिया आघाडीचेच वर्चस्व राहणार असल्याचे मत युवा सेना पदाधिकारी योगेश मढवी यांनी व्यक्त केले आहे. तसेच, येणाऱ्या काळात वाशी विभागाचा विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विकासकामांच्या जोरावर कायापालट करणार आहोत. येथील जनता सुज्ञ आहे त्यामुळे येथील भाजपच्या तालुकाध्यक्षाला उमेदवार सुद्धा मिळाला नसल्याने यातच त्यांची हार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वाशीच्या नागरिकांनी आम्हाला गावाची सेवा करण्याची संधी दिली असल्याने वाशीचा विकास हाच आमचा ध्यास आहे. वाशीचा मतदार राजा इंडिया आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असल्याने वाशी ग्रामपंचायतमध्ये सरपंचासह अकरा सदस्यांची संख्या येत असून यात इंडिया आघाडीची एक सदस्य बिनविरोध निवडून आल्याने ही विजयाची नांदी असल्याचे मत सरपंचपदाचे उमेदवार संदेश ठाकुर यांनी सांगितले.

Exit mobile version