14 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबरदरम्यान टी-20चा थरार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये होणार्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत भूषविणार आहे. 14 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यापूर्वी भारताने शेजारील देश पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं. भारताने 1987,1996 आणि 2011 मध्ये वर्ल्डकपचं यजमानपद भूषवलं आहे. मात्र, पुढील वर्षी होणार्या वर्ल्डकपचं आयोजन भारत स्वत:च करणार आहे. दरम्यान, भारतातील दहा शहरांमध्ये या वर्ल्डकपचे सर्व सामने खेळवले जाणार आहेत.
आयसीसीकडून वर्ल्डकपसारख्या मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन 2023 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. वर्ल्डकपचा पहिला सामना 14 ऑक्टोबर 2023 ला खेळवला जाणार आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्याचं आयोजन 23 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. तसेच दुसर्या उपांत्य फेरीतील सामना 24 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल आणि शेवटच्या अंतिम सामन्याचा थरार 26 नोव्हेंबरला रंगणार आहे. भारताच्या दहा मोठ्या शहरांमध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, वर्ल्डकपचे सामने इकाना स्टेडियम- लखनौ, ग्रीन पार्क स्टेडियम- कानपूर, इडेन गार्डन- कोलकाता, एम.ए.चिदंबरम स्टेडियम- चेन्नई, अरूण जेटली स्टेडियम- दिल्ली, नरेंद्र मोदी स्टेडियम- अहमदाबाद, राजीव गांधी स्टेडियम- हैदराबाद, वानखेडे स्टेडियम- मुंबई, पीसीए स्टेडियम- मोहाली पंजाब, एम चिन्नास्वामी स्टेडियम- बंगळूरू याठिकाणी रंगणार आहेत.