दिग्गज संघाविरुद्ध खेळण्याच्या संधीला मुकले
। फ्लोरिडा । वृत्तसंस्था ।
भारत आणि कॅनडा यांच्यातील टी-20 विश्वचषकातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. मैदानाची पाहणी केल्यानंतर पंचांनी हा निर्णय घेतला. भारत विरुद्ध कॅनडा मॅच रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. हा सामना रद्द झाल्याने भारताला आणि कॅनडाला स्पर्धेतील पुढच्या फेरीतील प्रवेशावर काही परिणाम होणार नाही. मात्र, कॅनडा सारख्या नवख्या संघाला भारतासारख्या दिग्गज संघाविरुद्ध क्रिकेट खेळण्याच्या संधीला मुकावे लागले. सामना रद्द झाल्यानंतर कॅनडाचे खेळाडू विराट कोहलीसोबत फोटो काढताना पाहायला मिळाले.
फ्लोरिडातील पूरस्थिती आणि पावसामुळे अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील 14 जूनला होणाराही सामना रद्द झाला होता. हा सामना रद्द झाल्याने अमेरिकेने सुपर-8 मध्ये प्रवेश केला. तर, पाकिस्तानच्या संघाला टी-20 विश्वचषकाबाहेर जावे लागले. फ्लोरिडामध्ये काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे मैदान ओलं असल्याने शनिवारचा भारत विरुद्ध कॅनडा सामनादेखील रद्द करावा लागला.
भारताचा साखळी सामन्यातील अखेरचा सामना जरी रद्द झाला असला तरी भारताने यापूर्वीच्या तीन सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. भारताने आयरलँड, पाकिस्तान आणि अमेरिकेला पराभूत केले आहे. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. तसेच, ‘अ’ गटातून भारतासह अमेरिकेने देखील सुपर78 मध्ये प्रवेश केला आहे.
भारताचे सुपर-8 मधील सामने भारताचा सुपर-8 मधील पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध 20 जूनला होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल. भारताचा सुपर-8 मधील दुसरा सामना 'ड' गटात दुसर्या स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध होईल. 'ड' गटातून बांगलादेश किंवा नेदरलँड सुपर 8 मध्ये प्रवेश करु शकते. ही मॅच 22 जूनला होणार आहे. तसेच, भारताचा सुपर-8 मधील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच 24 जूनला होणार आहे.