| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्यासाठी सर्व बाजूंनी मुस्कटदाबी सुरू केली आहे. सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे पाणीही पाकिस्तानसाठी बंद केले. आता त्यापुढे जाऊन चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पाकिस्तानसाठी आणखी एक धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
जम्मू-कश्मीरमधील बागलीहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर आता चिनाब नदीचे पाणी बागलीहार धरणाद्वारे रोखण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मूच्या रामबनमध्ये असलेल्या बागलीहार प्रकल्पातील पाण्याचे वहन नियंत्रित करण्याची भारताकडे क्षमता आहे. तसंच, झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही भारत लवकरच कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.






