रिझर्व्ह बँकेची कारवाई
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील पाच मोठ्या बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई केली आहे. पाच बँकांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये देशातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचा समावेश आहे.
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेला आरबीआयने एकूण 97.20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, केवायसी, क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. अॅक्सिस बँकेला 29.60 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ऑफिस खात्यांच्या अनधिकृत कामकाजाबाबत आरबीआयच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. आयडीबीआय बँकेला एकूण 31.8 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेती आणि संबंधित कामांसाठी दिलेल्या अल्पकालीन कर्जावरील व्याज अनुदानाशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदाला एकूण 61.40 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेत असलेल्या वित्तीय सेवा आणि ग्राहक सेवा काऊंटरवर जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल बीओबीवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रला एकूण 31.80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसीशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.