भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय

शुबमन, ऋतुराज, सूर्य चमकले ; गडी बाद करण्याचा शमीचा पंच

| माहोली | वृत्तसंस्था |

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर संपन्न झाला. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. टीम इंडियाने आपली तयारी किती पक्की आहे हे आजच्या विजयाने दाखवून दिले. भारताने ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून रोमहर्षक विजय संपादन केला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 277 धावांचा पाठलाग करताना भारताने अफलातून सुरुवात केली.

भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी 142 धावांची भक्कम भागीदारी करत विजयाचा पाया रचला. दोघेही शतकापासून जरी वंचित राहिले असले तरी त्यांच्या या शानदार भागीदारीमुळेच भारत कांगारुंना मात देऊ शकला. ते दोघे बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यात चांगले पुनरागमन केले होते. त्यांनी एकापाठोपाठ एक असे भारताच्या तीन फलंदाजांना तंबूत माघारी धाडले. मात्र, कर्णधार के.एल. राहुलने कर्णधाराला साजेसा खेळ खेळत आधी इशान किशन आणि नंतर सूर्यकुमार यादवला हाताशी घेत भारताला विजय मिळवून दिला. या विजयाने मालिकेत टीम इंडिया 1-0ने आघाडीवर आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला आहे.

मोहाली येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकात सर्व 10 गडी गमावून 276 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 52, जोश इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 142 धावा जोडल्या. ऋतुराजने 71 धावांची तर शुबमन गिलने 74 धावांची खेळी केली. तर, सूर्यकुमार यादव 50 धावा करून बाद झाला. कर्णधार के.एल. राहुलने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने 49व्या षटकात शॉन ॲबॉटला षटकार खेचून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारताने 1996 नंतर म्हणजेच 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये विजय मिळवला आहे. या मैदानावरील दोघांमधील हा सहावा सामना होता. यापैकी भारताने दोन आणि ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. 1996 नंतर आता भारतीय संघाने बाजी मारली आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने मागील चार एकदिवसीय सामने जिंकले होते. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 24 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये खेळवला जाईल.

Exit mobile version