। चिरनेर । वार्ताहर ।
चिरनेर परिसरात अवैध खैर वृक्षांची तोड राजरोसपणे सुरू असून वनविभागाचे अधिकारी मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. मोठ्या प्रमाणात होणारी बेकायदेशीर खैर वृक्षांची तोड पाहता वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून वनमाफियांकडून वृक्षांवर सर्रास कुर्हाड चालवली जाते. त्यामुळे वनसंपदा व वनऔषधी वनस्पती नष्ट होऊन पर्यावरणाचा र्हास होताना दिसत आहे. या खैराच्या लाकडाचा वापर कात काढण्यासाठी केला जातो. खैराचे व्यापारी आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यात सोटेलोटे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विना परवाना वृक्ष तोड थांबवावी, अशी मागणी निसर्गप्रेमी व जागरूक नागरिकांच्या वतीने होत आहे.