एकाच दिवशी पाच मालवाहू विमानांचे आगमन
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी वाहतुकीसोबतच आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे. नुकतेच एकाच दिवशी पाच मालवाहू विमानांनी विमानतळावर यशस्वीपणे आगमन केले. यामध्ये अबुधाबीहून सुमारे 46 टन विशेष माल घेऊन आलेल्या महाकाय अँटोनोव्ह एएन-124 ‘रुस्लान’सह बोईंग 777, एअरबस ए330 आणि बोईंग 737 या प्रकारच्या मालवाहू विमानांचा समावेश होता. या हालचालींमुळे नवी मुंबई विमानतळाच्या मालवाहतूक क्षमतेकडे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्राचे लक्ष वेधले गेले आहे.
अँटोनोव्ह एएन-124सारखे अवजड मालवाहू विमान हाताळण्यासाठी धावपट्टी, विमानतळावरील जागा, विमानतळ वाहतूक नियंत्रण तसेच जमिनीवरील माल हाताळणी यंत्रणेची सक्षम तयारी आवश्यक असते. एकाच दिवशी विविध प्रकारच्या पाच मालवाहू विमानांचे संचालन झाल्याने नवी मुंबई विमानतळावरील या यंत्रणांची प्रत्यक्ष क्षमता तपासली गेली.
नवी मुंबई विमानतळाच्या कार्गो व्यवस्थेला आता आंतरराष्ट्रीय सेवांची जोड मिळत आहे. हाँगकाँग एअर कार्गोने ऑगस्टमध्ये नवी मुंबईतून समर्पित मालवाहू सेवा सुरू केली असून, इतर आंतरराष्ट्रीय मालवाहू कंपन्यांच्याही सेवा वाढत आहेत. यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मालवाहतुकीचा काही भार नवी मुंबईकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई विमानतळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जेएनपीए बंदर, महामार्गांचे जाळे आणि अटल सेतूशी असलेली जोडणी. बंदरातून येणारा माल रस्ते मार्गाने विमानतळावर आणून तेथून हवाई मार्गाने परदेशात पाठविण्याच्या ‘सी-टू-एअर’ वाहतुकीला या जोडणीमुळे चालना मिळू शकते. विशेषतः वेळेचे महत्त्व असलेल्या औषधे, नाशवंत कृषी उत्पादने, प्रक्रिया केलेले अन्न आणि उच्च मूल्याच्या मालासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या अधिकृत माहितीनुसार, प्रारंभिक टप्प्यात सुमारे 5 लाख मेट्रिक टन वार्षिक कार्गो हाताळणीची क्षमता नियोजित आहे. पुढील टप्प्यांमध्ये ही क्षमता आणखी वाढविण्याचे नियोजन आहे.
या कार्गो सुविधेमुळे पनवेल, उरण, तळोजा औद्योगिक क्षेत्र, द्रोणागिरी आणि परिसरातील गोदामे, शीतगृहे, वाहतूक तसेच लॉजिस्टिक व्यवसायांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कोकणातील फळे, भाजीपाला, समुद्री उत्पादने, प्रक्रिया केलेले अन्न आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील मालाला जलद आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची क्षमता या हवाई मालवाहतूक केंद्रात आहे.
मात्र, विमानतळाच्या वाढत्या कार्गो हालचालींबरोबरच प्रत्यक्ष किती टन माल हाताळला जात आहे, महिन्याला किती कार्गो उड्डाणे होत आहेत आणि त्यातील आयात-निर्यातीचे प्रमाण किती आहे, याची अधिकृत आकडेवारी समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही आकडेवारी उपलब्ध झाल्यास नवी मुंबई विमानतळ प्रत्यक्षात किती वेगाने आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक केंद्र म्हणून विकसित होत आहे, याचे अधिक स्पष्ट चित्र समोर येईल.
