खंडित पाणी पुरवठा सुरळीत

। पनवेल । ग्रामीण वार्ताहर ।

एमजेपीची पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी (दि.25) संध्याकाळपासून पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली तसेच करंजाडे वसाहतींचा पाणी पुरवठा अचानक खंडित झाला होता. दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि.26) फुटलेली जलवाहनी दुरुस्ती करण्यात एमजेपीला यश आले असले तरी सर्वच भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी गुरवारी (दि.27) सकाळपर्यंतचा वेळ लागणार असल्याने नागरिकांना एन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर पंपीगद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम सुरु केले जाते. मात्र, या सर्व प्रक्रियेला तीन ते चार तासाचा कालावधी लागत असल्याने काही भागात इमारतींना सायंकाळपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल, तर ज्या भागात उंच टाक्यातून पाणी पुरवठा करण्यात येतो त्या भागात पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची माहिती सिडकोचे पाणी पुरवठा अधिकारी प्रफुल देवरे यांनी दिली आहे.

Exit mobile version