आदिवासींचे ठिय्या आंदोलन
| नेरळ | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणार्या 12 वी मधील विद्यार्थ्यांने शाळेत आत्महत्या केली होती. त्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी शासनाने चौकशी समिती गठीत करावी या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने पेण येथील प्रकल्प कार्यालयावर आंदोलन केले. सानेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या प्रवेश बांगारे या बारावी ईयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने परीक्षा सुरू होण्याआधी एक दिवस आत्महत्या केली होती. आपला मुलगा अभ्यासात हुशार होता आणि तो आत्महत्या करू शकत नाही अशी भूमिका पहिल्या दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेतली आहे.परीक्षेचे टेन्शन घेतल्याने त्याने आत्महत्या केली अशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली होती, मात्र सदर आत्महत्या बाबत गुन्हा दाखल होऊन कोणत्याही प्रकारची चौकशी पोलिसांकडून केली जात नाही. यामुळे आदिवासी राष्ट्रीय एकता परिषद यांच्याकडून प्रवेश बांगारे या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी पेण येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय तसेच ठाणे येथील आदिवासी विकास विभागाचे उप आयुक्त यांच्याकडे दाद मागितली होती.
मात्र या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत आदिवासी विकास विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.त्यामुळे आदिवासी राष्ट्रीय एकता परिषद यांनी पेण येथील प्रकल्प कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. त्यावेळी परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण निर्गुडा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी पेण तालुका अध्यक्ष कृष्णा खाकर यांनी मयत विद्यार्थ्यांच्या पालकांसह आंदोलन केले. त्यावेळी पेण येथील आदिवासी विकास विभागाचा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य कांता पादिर यांनी धरणे आंदोलन करणार्या कार्यकर्त्यांची भेट घेतली.त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आम्ही सर्व उचलून धरू असे आश्वासन पादिर यांनी दिले आहे.