42 ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन

| अलिबाग | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना गुरूवारी आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आतापर्यंत 101 ग्रामपंचायतींना हे प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

शासन व्यवहारात पारदर्शकता तसेच गतिमानता यावी यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीमधील विविध रजिस्टर्स, फॉर्मस, दस्ताऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींची कार्यपद्धतीचे पुर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मिती करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2019 मध्ये घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, स्वच्छतागृहे बांधणे, गावात साफसफाई असणे, गावात व्यायमशाळा, स्वच्छ पाणीपुरवठा करणे, घरपट्टी पाणीपट्टी वसुली, ग्रामसभांत नियमित विषयांवर चर्चा, गावात वृक्षारोपण करणे यासह इतर शासकीय योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे.

गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते आयएसओ मानांकन मिळालेल्या 42 ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कर्जत पंचायत समिती गट विकास अधिकारी चंद्रकांत कांबळे, विस्तार अधिकारी उज्वला भोसले, विकास जाधव, सहदेव चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

जानेवारी महिन्यापासून 59 ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन
जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना आयएसओ करण्यासाठी जिल्हा परिषदेने सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. या सर्व प्रयत्नांना यश मिळाले असून, जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील बोरीस गुंजीस, सातीर्जे, सारळ ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले होते. यानंतर फेब्रुवारी महिन्यात अलिबाग तालुक्यातील कामार्ली ,उरणमधील पुनाडे व दिघोडे तसेच पेण तालुक्यातील उंबर्डे या चार ग्रामपंचायतींना तर मार्च महिन्यात नागाव, एप्रिल महिन्यात पेण तालुक्यातील बोर्जे, कांदळे, निगडे, गागोदे खुर्द, वाक्रुड, वरप, मसद बुद्रुक, जिते तर सप्टेंबर महिन्यात अलिबाग तालुक्यातील नारंगी या ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. तर नुकतेच कर्जत तालुक्यातील खांडपे, कोंदीवडे, बीड बुद्रुक, शिरसे, वेणगाव, वदप, तिवरे, वरई तर्फे निड, सावेळे, हालीवली, कडाव, पोटल, भालीवली, भिवपुरी, मांडवणे, सावळा-हेदवली, पळसदरी, उक्रुळ, किरवली, उमरोली, नेरळ, ममदापूर, शेलू, कशेळे, वाकस, जिते, कोल्हारे, दहीवली तर्फे वरेडी, मानिवली, पोशिर, मोग्रज, पाथरज, कळंब, वारे, साळोख तर्फे वरेडी, आसल, दामत-भेडवळ, नसरापूर, पाषाणे, पिपळोली, माणगाव तर्फे वरेडी, वैजनाथ या 42 ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

Exit mobile version