भाजपला बहुमत मिळणेही अवघड: पृथ्वीराज चव्हाण

। मुंबई । प्रतिनिधी ।

देशातील लोकसभा निवडणूक ही लोकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही अवघड दिसत आहे. परिणामी केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता असल्याचे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तविले.

विविध राज्यांमधून आढावा घेतल्यानंतर भाजपला पुन्हा सत्ता मिळणे अवघड असल्याचे दिसत आहे. देश आणि राज्यात भाजपविरोधी वातावरण दिसत आहे. परिणामी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सहजपणे सत्ता स्थापन करणार्‍या भाजपला सध्या बहुमताचा 272 चा आकडा गाठणेही अवघड दिसत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

देशात जी परिस्थिती आहे, तीच स्थिती महाराष्ट्रातही आहे. महाराष्ट्रात महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार गटाची लोकसभेची एकही जागा निवडून येणार नाही. शिंदे गटाच्या तीन-चार जागा निवडून येऊ शकतात. तर, काँग्रेसला 12 जागांवर यश मिळू शकते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तविला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती होती. त्यामुळे या दोघांनी सहा टक्के मते घेतली. परंतु, यंदा एमआयएमची साथ नसल्याने वंचितला पूर्वीइतकी मतं मिळणार नाहीत. तर, देशपातळीवर इंडिया आघाडीलाही चांगले यश मिळेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. इंडिया आघाडीला देशभरात साधारण 240 ते 260 जागा मिळतील. याउलट 2019 च्या तुलनेत एकाही राज्यात भाजपच्या जागा वाढतील, असे दिसत नाही. ‘अबकी बार चारसो पार’ ही स्वत:चीच घोषणा पंतप्रधान मोदींच्या अंगलट आल्याची टिप्पणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Exit mobile version