आर.अश्विनचे स्पष्ट मत
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघात संजू सॅमसनला स्थान मिळणे अशक्य वाटत असल्याचे मत क्रिकेटपटू आर.अश्विन याने व्यक्त केलेले आहे.
अश्विन आपल्या यू ट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, विंडीज मालिकेत संधी मिळालेला खेळाडू म्हणजे संजू सॅमसन. त्याने एक दिवसीय मालिकेत अर्धशतकी खेळी केली होती. टी-20 मालिकेत त्याने 12 चेंडूत 12 धावा केल्या. त्याला मधल्या फळीत फलंदाजीची संधी मिळाली. आयपीएलमध्ये तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. संजू सॅमसनचे वनडेमध्ये चांगले रेकॉर्ड आहे. त्याची सरासरी देखील चांगली असून त्याने तिसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी देखील केली आहे. त्याने फिरकीवर हल्ला चढवला होता. त्याची ही खासियत आहे, असेही अश्विनने नमूद केले आहे.
अश्विन पुढे म्हणाला की, भारतीय संघाबाबत बोलायचं झालं तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा स्लॉट हा रिकामा नाही. संजूकडील गुणवत्ता पाहता तो कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र पालटू शकतो. तो एक चांगला फलंदाज आहे. त्याचं भलं व्हावं हे आपल्या सर्वांना हवंच आहे. मात्र भारतीय संघ संजूकडून वेगळ्या भुमिकेची अपेक्षा करतोय, असे त्याने नमूद केले.
संजू सॅमसनसाठी चौथ्या क्रमांकावर कोणतीही जागा रिक्त नाही. त्याच्यासाठी टीम इंडियातील जागा ही वर्ल्डकपनंतर किंवा दोन तीन वर्षांनी रिकामी होईल. आपल्याकडे वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.
आर.अश्विन, क्रिकेटर
संजू सॅमसन संघात का बसू शकत नाही याचं स्पष्टीकरण देताना अश्विन म्हणतो की, विराटची तिसऱ्या क्रमांकावरची जागा निश्चित आहे. रोहित आणि गिल हे सलामीला येतील ही देखील काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. जर अय्यर आणि केएल फिट झाले तर त्यांचही जागा निश्चित आहे. आपल्याला फक्त बॅकअप म्हणून चौथ्या-पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज गरजेचा आहे. मात्र संजू आयपीएलमध्ये ही भूमिका निभावत नाही. त्याने फक्त एक दिवसीय मध्ये या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरूवात केली आहे. त्याने या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली आहे. ही भारतीय संघासाठी चांगली गोष्ट आहे. वनडे वर्ल्डकपबद्दल बोलायचं झालं तर संजू सॅमसन सध्या बॅकअप प्लॅनमध्ये आघाडीवर आहे. तिलक वर्माचा देखील विचार केला जात आहे, असे अश्विनने सांगितले.