‘जय श्री राम’ बोलला नाही

कणकवली येथे मुस्लीम तरुणाला मारहाण

| कणकवली | वृत्तसंस्था |

‌‘जय श्री राम’चा नारा दिला नाही म्हणून एका मुस्लीम तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जानेवारी महिन्यात सदर तरूण आपल्या कुटुंबासह कणकवलीहून मुंबईला रेल्वेने येत होता. यावेळी काही तरुणांचा गट त्याच डब्यात ‌‘जय श्री राम’ अशी घोषणाबाजी करत होता. त्यांनी मुस्लीम तरुणालाही घोषणाबाजी करण्यास सांगितले. पण मी घोषणा का देऊ? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर सदर तरूणाने पनवेल पोलीस स्थानकात याबद्दल तक्रार दाखल केली. ही तक्रार कणकवली येथे वर्ग केल्यानंतर सदर तरूणाला गावी मारहाण झाली.

मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आसिफ शेख असे आहे. त्याने पोलिस तक्रारीत म्हटले की, तो त्याच्या कुटुंबासह कणकवलीहून मुंबईकडे रेल्वेने येत होता. यावळी त्याच्या डब्यात 30 ते 40 विद्यार्थ्यांचा जमाव होता. ते जय श्री राम च्या घोषणा देत होते. माझ्या बायकोने बुरखा घातला होता. विद्यार्थ्यांचा गट आमच्याकडे येऊन जय श्री राम म्हणा असे सांगत होता. आम्हाला हे बोलण्याची बळजबरी करू नका, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी माझ्या मुलीच्या अंगावर गरम चहाचा कप फेकला. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आसिफ शेख याने दिली. पोलिसांनी सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. पण मी तक्रार केल्याशिवाय मागे हटणार नाही म्हणाल्यानंतर त्यांनी तक्रार घेतली. मात्र यावेळी त्यांनी माझ्यावरही तक्रार दाखल केली. विद्यार्थ्यांच्या त्या गटातील एका महिनेले माझ्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप ठेवून तक्रार दाखल केली.

कणकवलीच्या गावात जाऊन मारहाण
तीन दिवसानंतर मला पोलिसांनी फोन करून सांगितले की, माझी तक्रार कणकवली पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आली आहे. गुन्हा तिथे घडल्यामुळे असे केले आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबासह 24 जानेवारी रोजी कणकवली पोलीस ठाण्यात गेलो. त्यावेळी तिथे भाजपाचा एक नेते आणि मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. भाजपाच्या नेत्याने मला तक्रार मागे घेण्यास सांगितले. नाहीतर माझ्या कुटुंबाला याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्यांनी दिली. शेखने पुढे सांगितले की, कणकवली पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवत त्याच्या घरापर्यंत पोहोचवले.मात्र घरी पोहोचल्यानंतर तिथेही 15 ते 20 जण आले. त्यांनी पुन्हा एकदा मला धमकी देत जय श्री राम बोलण्यास सांगितले आणि मला मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिस तिथेच उपस्थित होते. पण त्यांनी मारहाण करणाऱ्यांना रोखले नाही. माझी पत्नी मला वाचविण्यासाठी मध्ये पडल्यानंतर तिलाही जमावाने धक्काबुक्की केली, असा आरोप शेख याने केला आहे. त्यानंतर शेख याने पुन्हा एकदा पोलिसांत तक्रार दाखल केली असून 11 जणांचे नाव घेतले आहे. तर 20 हून अधिक लोकांना तो ओळखत नसल्याचे म्हटले.

Exit mobile version