। खोपोली । वार्ताहर ।
खरीवली, गोठीवली, नंदनपाडा या प्रस्तावीत एमआयडीसी प्रकल्पाला दहागाव शेतकरी संघर्ष समितीचा विरोध नसून, एमआयडीसी उभारताना कोणकोणत्या उत्पादनाचे कारखाने येणार आहेत याची माहिती देत स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार उपलब्ध करावा त्याचप्रमाणे शेतकर्यांना योग्य मोबदला दिल्यास एमआयडीसी प्रकल्पाला विरोध होणार नाही असे मत शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. दहागांव शेतकरी संघर्ष समितीची बैठक रविवारी खरीवली येथील भैरीनाथ मंदिरात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती,यावेळी शेकाप जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील,संतोष जंगम, खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील, पं.स. सदस्य उत्तम परबळकर,मनोहर शिंदे, दहागांव शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शांताराम पाटील, अशोक पाटील, मिलिंद दाभोलकर, जनार्दन खरिवले, राजू पाटील, परशुराम पाटील, सुरेश पाटील,ग्रामस्थ मिलेश पाटील,किरण पाटील,परशुराम पाटील(गोठवली),सुरेश पाटील, कुडंलीक पाटील, विष्णु पाटील यांच्यासह महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ.जयंत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांचे आंदोलन यशस्वी झाले असून पुढील मागण्याही त्यांच्याच माध्यमातून पूर्ण होतील असा विश्वास शेतकर्यांच्या वतीने बोलताना अशोक पाटील यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. यावेळी बोलताना आम.जयंत पाटील यांनी जो मोबदला 20 फूटावर संपादित घेतल्यावर दहा पट वाढतो आणि शेतकर्यांच्या पदरात काहीही पडत नाही. पाच,दहा वर्षाच्या मर्यादा करुन बाहेरच्या लोकांनी जमिनी विकत घेतल्यात त्यांचे भूसंपादन होते.असे त्यांनी निदर्शनास आणले. आभार विनायक पाटील यांनी व्यक्त केले.
मूळ मालकाला 50 टक्के हिस्सा मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत दहागांव शेतकरी संघर्ष समितीला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा देत आंदोलन केल्याने 25 टक्के भाव वाढवून देण्याची भूमिका एमआयडीसी आणि राज्यशासनाने घेतली आहे. यासाठी आम्ही तडजोड करण्यासाठी करण्यास तयार आहोत.- आम. जयंत पाटील,शेकाप सरचिटणीस
मुलभूत सुविधा आवश्यक
एमआयडीसी मधील कारखान्याला पाणी मिळते, रस्ते होतात मात्र गावं तशीच राहतात.त्यामुळे येथील पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते सुधारले पाहिजेत याची लेखी हमी देणारा कायदा विधीमंडळात बनवला पाहिजे अशी मागणी आम.जयंत पाटील यांनी केली आहे. दहागांव छत्तीशीमधील लोक शांत स्वभावचे असून शेतकर्यांचा आंदोलन शांतपणे लढतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
- दहागांव शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शांताराम पाटील यांनी आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांना घेवून जाण्याचा योग्य निर्णय घेतला असून हे न्याय मिळवून देतील – मारूती पाटील (शेतकरी)