मोहिनी गोरे
3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिवस. क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण आयुष्य म्हणजे स्त्री मुक्ती लढ्याबरोबरच बहुजन समाज मुक्तीचा लढा. त्यांचे कार्य मानवताधर्माचे आहे म्हणूनच ते समाजातील विषमतेच्या विरुद्ध लढण्यासाठी आजही दिशा व प्रेरणा देणारे असे महान कार्य आहे. 9 वर्षाची सावित्री आणि तेरा वर्षाच्या ज्योतिबांचा विवाह त्या काळचा विचार करता ठिकच होते. शिक्षणाने विचारात बदल होणे व अधिक अधिक उन्नत होणे अपेक्षित आहे. अशा या प्रगत वैचारिकता असलेल्या समाजात मग विवाहाचे वय 18 वर्षे की एकवीस वर्षे पाहिजे हा मुद्दा उरत नाही. मुद्दा आहे तो समाज बदलण्याचा आणि नेमके तेच फुले दाम्पत्याने आपल्या सहजीवनातून तसेच समाजात वावरताना प्रत्येक गोष्टीतून दाखवून दिले. आज आम्ही भारतीय महिला फेडरेशनने हीच मागणी लावून धरली आहे. महिला सशक्तीकरण, शिक्षण, रोजगार, पोषण आहार, समाजाचे तिच्या प्रति वागणे, बघणे या गोष्टीवर भर दिल्यानंतर अशा या सशक्त वातावरणात वाढलेली महिला 18 वर्षानंतर मत देण्याच्या अधिकाराबरोबरच आपण लग्न कधी करावे हे ठरवू शकते. ज्योतिबाची आई ते एक वर्ष होण्याच्या आधीच गेल्या असल्यामुळे त्यांचा आईच्या मायेने सांभाळ केला तो त्यांची मावस बहीण सगुणाबाई म्हणजेच त्यांच्या ‘आऊ.’ सगुणाबाई ख्रिस्ती मिशनरी जॉन यांच्या मुलांना सांभाळण्याचे काम करत होत्या. त्यामुळे त्यांना इंग्रजी ही बर्यापैकी अवगत होती. ज्योतिबांनी त्यांना मराठी शिक्षण दिले. सावित्रीबाईंना ज्योतिबांनी शिकवले. दोघींचे शिक्षण झाल्यावर नॉर्मल स्कूलच्या मीचल मॅडमनी सावित्रीबाई व सगुणाबाईंची परीक्षा घेतली आणि त्यांची शिक्षणातील प्रगती उत्तम असल्या कारणाने दोघींनाही ट्रेनिंगच्या तिसर्या वर्गात प्रवेश दिला. 1857 ला आपली आद्यशिक्षीका सावित्रीबाई फुले रीतसर ट्रेनिंग घेऊन शिक्षिका झाल्या. 1855 मध्ये काव्यफुले या त्यांच्या काव्यसंग्रहातील कवितेत सावित्रीबाई फुले निसर्ग आणि त्याबरोबर संपूर्ण मानवजातीचे नाते कसे असावे ते सांगतात…
सुंदर सृष्टी सुंदर मानव
सुंदर जीवन सारे
सदभावाच्या पर्जन्याने
बहरूनी टाकू बा रे
मानवी जीवन हे विकासुया
भय चिंता सारी सोडुनिया
इतरा जगवू स्वतः जगू या
मानव प्राणी निसर्ग सृष्टी द्वय
शिक्क्याचे नाण एकच असे
म्हणून सृष्टीला शोभून
मानव लेणे
आजच्या मुठभर उद्योगपती तसेच राजकारणी यांच्या अति हव्यासापोटी निसर्ग संसाधनाचा, मानवी मूल्यांचा अमानवी पद्धतीने नष्ट करणार्यांनी आज या पृथ्वीचे तिच्यावरील लोकांची काय अवस्था केली आहे हे लक्षात येते. निसर्ग-सृष्टीचे आणि मानवाचे नाते हे सशक्त नसल्याकारणाने आज नेहमीच युद्ध सदृश्य स्थिती, मूलभूत गरजासाठीचा संघर्ष करणारे लोक, ग्लोबल वॉर्मिंग इशारा, प्रदूषण ई समस्या त्याचेच द्योतक आहे.
1848 ला पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात जिथे सावित्रीबाई फुले शिक्षिका आणि दुसरी शाळा दलित वस्तीमध्ये तिथे सगुणाबाई शिक्षिका होत्या. अर्थातच शिक्षिका म्हणून काम करणे सोपे नव्हतेच. कारण हे शिक्षणाचे व्रत ज्या बहुजन समाजाला, शूद्र, अतिशूद्र व सर्वच जातीतील स्त्रियांना जिथे शिक्षणाचा अधिकार नव्हता अशा वेळी स्त्री शिक्षिका म्हणून शिकवणे याची कल्पना सहज येईल. आजही दलित व स्त्रीवर्गावर होणारे अन्याय अत्याचाराची अमानवी उदाहरणे दिसून येतात. त्यावरून त्याचे भीषण स्वरूप कसे होते हे लक्षात येते. दगड गोटे, शेणमाती, गलिच्छ भाषा, शिव्याशाप या सर्वांचा मार झेलून सावित्रीबाईंनी शिक्षणाचे व्रत आयुष्यभर जोपासले. विषमता व मनुस्मृतीला मानणारे काही स्वयम् घोषित उच्चवर्णीय लोकांचा ‘मनू’ काय म्हणतोय ते सावित्रीबाई आपल्या ओवीतून सांगतात.
नांगर धरती शेती जे करती
मठ्ठ ते असती मनू म्हणे.
करू नका शेती सांगे
मनुस्मृती
धर्माज्ञा करती ब्राह्मणास,
शूद्र जन्म घेती पूर्वीची
पापे ती जन्मी या फेडती
शूद्र सारे धूर्ताची ही
निती अमानव .
सावित्रीबाईंनी त्या विषम व विपरीत परिस्थितीमध्ये शिक्षण, जातीपाती निर्मूलन, अनिष्ठ रूढी परंपरांना विरोध, ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन प्रथा बंद करणे, विधवा कुमारी माता प्रसूतिगृह, विनावेतन शिक्षिकेचे काम इत्यादी अनेक कामातून समाज प्रबोधनाचे केलेले कार्य अलौकिकच आणि म्हणून भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न पारितोषिका एवढे सरस आहे याबद्दल मनात कुठलीच शंका नसावी. सावित्री ज्योतिबा फुले यांनी काढलेल्या शाळांची वाढती संख्या त्यात शिकण्यासाठी येणार्या सर्वच वर्गातील मुली आणि त्यांची प्रगती पाहता त्या वेळच्या इंग्रज अधिकार्यांनी शिक्षण विभागाकडून फुले दाम्पत्याचा जाहीर सत्कार केला. त्यांच्या शाळेतील मुक्ता साठे या मुलीचा व इतर मुलींचे निबंध म्हणजे त्याकाळच्या अत्यंत विषारी समाज जीवनाचे खरे स्वरूप समोर आणते.ही व्यवस्थेविरुद्ध बोलण्याची निर्भयता त्यांच्याबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही आली होती.
एकदा सावित्रीबाई फुले शाळेत जात असता एका आडदांड इसमाने आडवून शाळा शिकवण्याचं काम थांबव, नाही तर अब्रू घेऊ. अशा मोठ्या कठीण वेळी प्रसंगावधान राखून त्यांनी भर रस्त्यात त्या इसमास थोबाडीत दिल्या. तो इसम तिथून पसार झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सात वर्ष त्या दोघांनी उभे केलेले समाजसेवेचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजातील व इतर सहकार्यांबरोबर केले. आज एकविसाव्या शतकातील भारत त्याची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सार्वजनिक आरोग्य सेवा अशा बर्याच क्षेत्रातील आधीच झालेली पिछेहाट स्पष्टपणे अधोरेखित झाली ती कोविड महामारीत. यामागे नक्कीच सरकारची, प्रशासनाची व काही प्रमाणात समाजाची देखील असंवेदनशीलता कारणीभूत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू प्लेग साथीत समाजसेवा, रुग्णांची सेवा करत असताना 10 मार्च 1897 ला झाला.
कार्यकाळ बदलला तसे स्रीपुरुष वर्गापुढील आव्हाने, संकटे आणि विश्व बदलले आहे. आज समाज सुशिक्षित झाला पण समाजाची मानसिकता मात्र बर्याच प्रमाणात मागास व पुरुष प्रधान आहे. तसे काही चांगले बदल होत आहेत. मी टू चळवळीअंतर्गत मुली-महिलांवर विनयभंग, अन्याय व अत्याचार करणार्या तथाकथित सुशिक्षित पुरुषांविरुद्ध जाहीर बोलू लागल्या आहेत. महाराष्ट्रात येऊ घातलेला ‘शक्ती’ कायद्याने अन्याय अत्याचार करून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मोकाट फिरणार्या समाजाला जाग आणता येईल. अर्थात कायद्याचे स्वरूप कसे असेल हे आणखी स्पष्ट झाले नाही. तेव्हा 21 व्या शतकातील महिलांनी आधुनिक, स्वावलंबी, स्वनिर्भर, स्वाभिमानी आणि विशेष म्हणजे स्वनिर्णयी बनणे ही काळाची गरज आहे. याकरिता स्त्री-पुरुष दोघांनीही मिळून प्रयत्न करावे लागतील. पूर्वीच्या काळात धर्मशास्त्राप्रमाणे तरुणपण व वृद्धपणी पति-पुत्राचे नियंत्रण राहील, हे कालबाह्य ठरावे.आज जिल्हा परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतीमध्ये 33 टक्के आरक्षणामुळे महिला लोकप्रतिनिधी बनून सत्तेवर आल्या. परंतु बर्याच अंशी सत्तेची दोरी ही त्यांच्या पिता, पती किंवा भाऊ या पुरुष वर्गाच्या हाती आहे . निर्णयप्रक्रियेत तिला सामावून घेतले तर बदल होईल.
यात बदल करावा लागेल राहिली. म्हणून स्त्रीला आता सक्षम व स्वनिर्णयी बनणे गरजेचे आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ या नाविन्यपूर्ण अभियानानंतर आता वेळ आली आहे की बेटी लढो और संघर्ष करो. म्हणून आता पुन्हा एकदा सावित्री, फातिमा, सगुणाबाई जिजाऊचा लढाऊ बाणा, सामाजिक विषमतेच्या विरोधात प्रत्यक्ष विठ्ठलालाच प्रश्न करणार्या संत महिला तसेच महात्मा फुले सारखे अनेक ज्योतिबा समाजात तयार होऊन लोकप्रतिनिधींना व व्यवस्थेला जाब विचारण्याची वेळ आली आहे.
कुटुंबव्यवस्था कोलमडून पडण्याच्या अवस्थेत येऊन पोहोचलेली आहे तर समाज व्यवस्था जीर्णशीर्ण झालेली असताना विषम, कठीण आणि भयमूलक परिस्थितीमध्ये स्रीवर्गाने आज पुढे येऊन जोडण्याचे अभूतपूर्व कार्य करण्याची अशी ऐतिहासिक जबाबदारी तिला हाती घ्यावी लागेल. कारण जगामध्ये शेतीचा शोध, मातृसत्ताक पद्धती व गावपंचायतीचा गाडा तिनेच हाकलला आहे ते विसरून कसे बरे चालेल. म्हणून पुन्हा एकदा सावित्रीमाई विचाराच्या वारसदार आधुनिक लेकींनी आपली सुप्तावस्थेतील शक्ती, ऊर्जा, प्रेरणा जागृत करून माणसाला माणसाशी जोडण्याचे कार्य तिची सर्जनशीलता करू शकते, हे निश्चित आहे.