कृषीवल जनसामान्यांचा आवाज: कार्यकारी संपादक माधवी सावंत
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कृषीवल हा जनसामान्यांचा आवाज असून, विश्वासार्हता हीच कृषीवलची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन कार्यकारी संपादक माधवी सावंत यांनी केले. गेल्या नऊ दशकांत कृषीवलने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बदलत्या युगात एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असे आवाहन सावंत यांनी केले. प्रिंट मीडियाबरोबरच डिजिटल स्वरुपातही कृषीवल घराघरात पोहोचला आहे. मागील तीन वर्षांत चार लाखांहून अधिक वाचकांनी कृषीवलला पसंती दिली आहे. आगामी काळात एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील असून, रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा ठसा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व पत्रकारांनी लेखणीला धार आणून सामान्य जनतेचे, कष्टकरी, कामगार, बहुजन, तरुण, महिलांचे प्रश्न प्रामुख्याने मांडून ते सोडविण्याचे काम करावे, असे आवाहन सावंत यांनी उपस्थितांना केले.

वाचकांना केंद्रस्थानी ठेवून आपला देदीप्यमान वारसा यशस्वीपणे पुढे घेऊन जाणार्या कृषीवलचा 89 वा वर्धापन दिन वाचकांच्या शुभेच्छांच्या वर्षावात अलिबागमधील वेश्वी येथील मॅपल आयव्ही हॉटेलमधील सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी माधवी सावंत बोलत होत्या. सात जून रोजी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मुहूर्तमेढ रोवलेल्या कृषीवलच्या आजच्या वर्धापनदिनी मान्यवरांसह वाचकांच्या सन्माननीय उपस्थितीने एकमकांना शुभेच्छा देत रंगलेल्या सोहळ्याने आनंद द्विगुणित केला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक शरद कोरडे, ज्येष्ठ पत्रकार आनंद जोशी, कृषीवलच्या व्यवस्थापक हर्षा नाईक-पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, कृषीवलचे सहयोगी संपादक सुयोग आंग्रे, वरिष्ठ उपसंपादक राकेश लोहार, जिल्ह्यातील प्रतिनिधी, छायाचित्रकार, कृषीवलमधील संपादकीय, जाहिरात, वितरण व प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माधवी सावंत म्हणाल्या की, शेतकरी, कामगार, कष्टकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी कृषीवलची निर्मिती झाली. स्व. नारायण नागू पाटील यांनी कृषीवल वृत्तपत्र सुरु केले. कृषीवलची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. भविष्यात संपूर्ण देशामध्ये कृषीवलचा एक वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गजर आहे. सर्व घटकाला न्याय देण्यासाठी कृषीवलच्या माध्यमातून अधिक जोमाने काम केले जाईल. कृषीवलचे यू ट्यूब चॅनल लवकरच सुरु होत असून, वृत्तपत्राबरोबरच चॅनलच्या माध्यमातून सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न कृषीवल करेल असा विश्वासदेखील माधवी सावंत यांनी व्यक्त केला.
धोरण, ब्रीद कृषीवलने जपले: आनंद जोशी
गेल्या अनेक वर्षांपासून कृषीवलचा पत्रकार म्हणून काम करीत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी निर्माण झालेला कृषीवल आज 89 वर्षांचा झाल्याचा आनंद आहे. कृषीवलने ब्रीद व धोरण न बदलता आजही विचारांची परंपरा जपण्याचे काम केले आहे. हे वाखाण्याजोगे आहे. कृषीवल शंभर वर्षांच्या वाटेवर आहे. ही भरभराट अशीच पुढे सुरू राहावी, अशा शुभेच्छा ज्येष्ठ पत्रकार आनंद जोशी यांनी दिल्या.
कृषीवल एक वेगळ्या उंचीवर: शरद कोरडे शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी स्व. नारायण नागू पाटील यांनी कृषीवल नावाची चळवळ सुरू केली. जनसामान्यांचा आवाज म्हणून कृषीवलकडे पाहिले जाते. कृषीवलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करण्याची संधी मिळाली आहे. स्व. प्रभाकर पाटील यांच्यामुळे कृषीवलशी जोडलो गेलो. आज कृषीवल एक वेगळ्या उंचीवर काम करीत असल्याचा आनंद ज्येष्ठ साहित्यिक शरद कोरडे यांनी व्यक्त केला.
कृषीवल एक नंबर वृत्तपत्र
कृषीवल सर्वसामान्यांना न्याय देणारे वृत्तपत्र आहे. एक वेगळ्या रुपात कृषीवल भरारी घेत असल्याचा आनंद आहे. लेखणीत खूप ताकद आहे. कृषीवलच्या माध्यमातून वेगवेगळे विषय मांडण्याची संधी मिळत आहे. कृषीवलची अधिक प्रगती व्हावी, अशी शुभेच्छा पेणचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी दिली.
जनसामान्यांच्या प्रश्नांना आवाज देणारे कृषीवल
शेतकर्यांचे कैवारी स्व. नारायण नागू पाटील यांनी कृषीवल सुरू केला आहे. पेझारीतून कृषीवलची निर्मिती झाली, त्याचा आनंद आहे. वेगवेगळे चढ-उतार कृषीवलने पाहिले आहेत. स्व. प्रभाकर पाटील यांच्यामुळे कृषीवलच्या माध्यमातून मला बातमीदार म्हणून लिहिण्याची संधी मिळाली. कृषीवल एक वेगळ्या रुपात दिसत आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना आवाज देण्याचे काम कृषीवल करीत आहे, असे पेझारीचे प्रतिनिधी प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले.
कृषीवल घराघरात पोहोचले
कृषीवल एक वेगळा विचार आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरच्या टोकापर्यंत कृषीवल घराघरात पोहोचला आहे. शेतकरी, कामगारांचा आवाज म्हणून कृषीवलची ओळख आहे. प्रिंट मीडियापासून डिजिटल स्वरुपातही कृषीवल भरारी घेत आहे, असे पोलादपूरचे प्रतिनिधी शैलेश पालकर म्हणाले.
कृषीवलची भूमिका प्रभावी
शाहू, फुले आंबेडकरांनी रुजविले विचार घेत श्रमजीवी, कष्टकरी घटकांसाठी कृषीवल काम करीत आहेत. एक वेगळ्या उंचीवर कृषीवल पोहोचले आहे. त्यामध्ये तळागाळापर्यंत काम करणार्या पत्रकाराची मेहनत त्याला जोडली गेली आहे. कृषीवल वाढविण्याचे, जपण्याचे काम संपादक खंबीरपणे करीत आहेत. कृषीवलची एक प्रभावी भूमिका राहिली असल्याचे पालीचे प्रतिनिधी धम्मशील सावंत म्हणाले.
कृषीवल शंभरीच्या वाटेवर
कृषीवल ज्यावेळी लहान आकाराचे होते, तेव्हापासून कृषीवल माझ्या घरी येत आहे. कृषीवलचा जन्मच पेझारीमध्ये झाला. कृषीवलमधून बातमी लिहिण्यास सुरुवात केली. आजतागायत कृषीवलमध्ये पत्रकार म्हणून काम करीत असल्याच आनंद आहे. कृषीवल शंभरीच्या वाटेवर असल्याचा आनंद आहे, असे श्रीकांत पाटील यांनी सांगितले.
कृषीवल रायगड जिल्ह्यातील आघाडीचे वृत्तपत्र
कृषीवल एक रायगड जिल्ह्यातील आघाडीचे वृत्तपत्र आहे. कृषीवलमधील बातमी वाचण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी आवर्जून पेपर घेण्यावर भर देतात. कृषीवल आता वेगळ्या रुपात आहे. वितरण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वितरक राजेंद्र मेहता म्हणाले.
कृषीलमधील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
कृषीवलचा 89 वा वर्धापन दिन अलिबागमधील वेश्वी येथील मॅपल आयव्ही हॉटेलमधील सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी कृषीवलमध्ये योगदान देणार्या सर्व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यकारी संपादक माधवी सावंत यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गुलाबाचे रोप देऊन जिल्ह्यातील पत्रकार, छायाचित्रकार, कार्यालयातील विविध विभागांतील प्रमुख, कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला.