भारत जोडो यात्रेची आजवर महाराष्ट्रात फारशी चर्चा नव्हती. राहुल गांधी सावरकरांवर बोलल्यानंतर मात्र एकदम ठिणगी पडली. सावरकरांनी तुरुंगवासातून सुटण्यासाठी अनेक माफीपत्रे पाठवली आणि नंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांना मदत केली असे राहुल यांचे दोन मुद्दे आहेत. सावरकरांनी माफीपत्रे पाठवली याचे पुरावे उपलब्ध आहेत. सुटका झाली तर आपण राजकारणापासून दूर राहू अशी हमीही त्यांनी दिली व तिचे त्यांना पालनही करावे लागले. बाहेर आल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांची पेन्शन मिळत होती हेही अनेकांनी दाखवून दिले आहे. त्यांनी छोडो भारत चळवळ, महात्मा गांधींचं राजकारण यांना विरोध केला आणि हिंदू महासभेने मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन करायला संमती दिली हेही इतिहासात नोंदले गेले आहे. त्यामुळे राहुल यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच. पण राहुल गांधी हे संसदीय राजकारणात आहेत. क्रांतिकारी चळवळीत नाहीत. सावरकरांना जे देवत्व बहाल केले जात आहे ते खोडून काढण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेण्याची त्यांना काहीही गरज नाही. हे काम त्यांनी विद्यापीठीय मंडळी वा इतिहासकारांवर सोडून देणे उत्तम. (महाराष्ट्रातील अभ्यासकांनी ते पूर्वीच केलेही आहे.) विचारवंत वगैरे लोकांना शुध्द तात्विक भूमिका घेणे शक्य असते. कारण, त्यांना जनतेत उतरून काम करायचे नसते वा निवडणुका लढवायच्या नसतात. इच्छा असो किंवा नसो राहुल यांना त्या लढवाव्या लागणार आहेत. त्यामुळे यात्रा भरकटेल असं कोणतंही त्यांनी वक्तव्य टाळायला हवं. सावरकरांबाबतची त्यांची टिपण्णी, तीही महाराष्ट्रात, अनावश्यक होती. त्यामुळे यात्रेने आजवर निर्माण झालेले वातावरण नष्ट होऊन काँग्रेसचा तोटा होण्याचीच शक्यता अधिक. डरो मत, नफरत छोडो असे नारे देत पदयात्रा वगैरे करीत असले तरी अंतिमतः त्यांचे उद्दिष्ट काँग्रेसचा पाया विस्तारावा हेच आहे व तेच असले पाहिजे. पन्नास-साठ वर्षे काँग्रेसच्या सर्वधर्मसमभावाला पाठिंबा देणारे भारतवासी आज तिच्यापासून कोसो दूर गेले आहेत. देशातील मध्यम जाती व वर्गच नव्हे तर दलित, आदिवासी व गरिबांनाही सध्या भाजपचे आकर्षण वाटते. त्या पक्षाने आपला हिंदुत्वाचा कार्यक्रम या सर्वच स्तरांमध्ये पोचवण्यात यश मिळवले आहे. गायीची पूजा, गोमांसाला बंदी यासारखे आपले मुद्दे भाजपने ज्या रीतीने रेटले आहेत ते त्याचे उदाहरण आहे. कोरोनाच्या काळात उत्तर प्रदेशात कितीतरी लोकांचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. तरीही सर्वजातीय लोकांनी अयोध्येतील राममंदिराबद्दल मोदींच्या पक्षाला मते दिली. सावरकर हेही असंच प्रतीक बनवण्याचा भाजपचा कार्यक्रम आहे हे लक्षात घ्यायला हवं. खरं तर सावरकर आणि भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे कधीच पटले नाही. म्हणून तर हिंदू महासभा असा पक्ष अस्तित्वात असूनही संघातील लोकांनी स्वतःचा जनसंघ हा पक्ष स्थापन केला. सावरकरांची गाणी, लेखन आणि त्यांच्याबद्दलच्या दंतकथा यामुळे मराठी मध्यमवर्गीयांना त्यांच्याविषयी पूर्वापार आकर्षण आहे. पण तरीही महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचा आणि राजकारणाचा प्रभाव कायम नगण्यच राहिला. स्वातंत्र्यानंतर जवळपास 19 वर्षे हयात असूनही सावरकर हे महाराष्ट्र किंवा देशाच्या राजकारणात असून नसल्यासारखे होते. गांधींच्या खुनातील त्यांच्या सहभागाचा संशय सर्वस्वी कधीच न फिटल्याने जनसंघवालेही त्यांचे नाव घेत नसत. आज मात्र देशस्तरावरचे भाजपवाले आपली मुळे सावरकरांमध्ये असल्याचे सांगत आहेत. कारण, स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेणारा हिंदुत्ववादी म्हणता येईल असा तोच एकमेव हिरो त्यांच्यापाशी आहे. पण, राहुल यांनी सावरकरांबाबत आपले विचार पूर्वी मांडून झाले आहेत. त्याच्या अस्थानी पुनरावृत्तीची गरज नाही. हिंदुत्ववादी राजकारणाला लक्ष्य करायचेच असेल तर कोरोनामध्ये किंवा परवा मोरबीमध्ये मेलेले बिगरहिंदू होते काय किंवा सध्या ते ज्या परिसरात आहेत तिथले ओल्या दुष्काळाची मागणी करणारे कोणत्या धर्माचे आहेत, असे सवाल अधिक प्रभावी ठरू शकतात. सावरकर हा एक इतिहास आहे. मोरबी किंवा ओला दुष्काळ हे वर्तमान आहे. वर्तमानावरून लक्ष हटवून इतिहासाच्या लढाया करणे हे भाजपच्या फायद्याचे आहे, राहुल यांच्या नव्हे. त्यामुळे आता बस्स झाले सावरकर हे त्यांना कोणीतरी सांगायला हवं.