भाई चंद्रशेखर नलावडे-पाटील
आज कोरोना आपत्ती काळात देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे वस्त्रहरण झाल्याची परिस्थिती असताना त्यावर दोन पाच टक्के सुद्धा चर्चा होताना दिसत नाही, अगदी नुरा कुस्तीतील प्रमुख विरोधी अवसानघातकी पैलवानाकडून सुद्धा. जगभरात नागरी हक्कांसाठी सार्वजनिक हस्तक्षेप आणि जबाबदारी अधिक मजबूत झाली पाहिजे आणि या बाबी खुल्या बाजारातील विक्रीच्या चीजवस्तू नव्हेत, याकडे जग पुन्हा वळत आहे आणि आपल्या देशात मात्र ‘मार्गारेट थॅचर बाईचे ब्रिटनमध्ये आणि रिचर्ड निक्सनचे अमेरिकेत पराभूत धोरणात्मक सिद्धांत’ भारतात लागू करण्याची चढाओढ लागली आहे. आता हे सिद्धांत आणि आजच्या भारताचा काय संबंध विचाराल? तर माझं हेच म्हणणं आहे की आपण नितीपेक्षा नेत्यांच्या चर्चेत आकंठ बुडालो आहे. जसे सत्ताधार्यांकडून मोदींना तारणहार म्हणून पेश केले आहे आणि त्याला पर्याय म्हणून काँग्रेसवाल्यांकडे गांधी घराण्याच्या पाळण्यात जो येईल तो पर्याय आहेच पेश करायला. पण हे दोघेही धोरणात्मक विषयांवर चर्चा करतच नाहीत कारण त्यांची धोरणं एकच आहेत. फार आर्थिक क्लिष्ट तपशीलात न जाता, भक्तांइतक्या सुमार अकलेच्या माणसालाही काही प्रश्न पडायला काय हरकत आहे? खरं तर ते प्रश्न पडतात. पण भिती वाटते की जर या प्रश्नांतून जर आम्ही निवडलेला तारणहार चौकीदार चोरच निघाला, तर मग परत विश्वास टाकायचा कुणावर? आणि प्रतिमापुजनाबाहेर जाऊन आत्मनिर्भरपणे सुज्ञ नागरिक व्हायची जबाबदारी घ्यावीच कशाला? आणि त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे, गेली सात वर्षे गळा फाडून, आँखे लाल करून आणि आधीच सेट असणार्या ईव्हीएमवर कमळाची बटणं कचाकच दाबून हे गाढव आपणच ओढून घेतलं आहे, त्यात मुर्ख ठरल्याची मानहानी पत्करायची कशी? अशा या मनोवैज्ञानिक निसर्ग वादळात तुर्ताच तरी उच्चभ्रू भक्त संप्रदाय अडकला आहे. या गाढवाचा पुढचा नांगर याच उच्चभ्रू भक्त संप्रदायावर चालून येणार आहे आणि याची पुसटशी सुद्धा कल्पना या शहरी शुचिर्भूत उच्चभ्रू भक्तांना नाही. गेल्या सत्तर वर्षांतील थोडीफार स्थिरावलेल्या ऐहिक आणि भौतिक स्वरूपातील भारतीयतेवर या गाढवाने अक्षरशः नांगर फिरवला आहे. आता फारच थोडी शक्तीस्थाने उरली आहेत, की ज्याला उद्ध्वस्त करण्यासाठी ही शक्तीस्थाने या गाढवाला खुणावत आहेत. खरं तर हे गाढव त्याच्या मर्जीने काहीच करत नाही आहे, तर त्याला नियंत्रित करणारा हुशार मालकांचा एक समुह आहे. सांस्कृतिक दहशतवादी संघोटे आणि आर्थिक दहशतवादी भांडवलदार यांचाच तो समुह या गाढवाला त्याच्या बेलगाम नांगरासह हाकतोय.
कोरोना आपत्तीत राजकारण टाळलं पाहिजे, एकत्र येऊन काम केले पाहिजे वगैरे समरसतेचं कीर्तन गाण्यापुरतं ठिक आहे. परंतु सरतेशेवटी या आपत्तीला सामान्य राजकीय अक्कल वापरून, उपलब्ध असणार्या अमर्याद शासकीय ताकदीपैकी थोडी अंमलात आणून आणि याकरिता प्रसिद्धीचा गांजा काही काळासाठी बाजुला ठेवुन, तज्ञांच्या मदतीने नियोजन केले असते, तर आजची ही आमंत्रण देऊन देशावर लादलेली आपत्ती खरंच टाळता आली असती. परंतु नखशिखांत विकल्या गेलेल्या प्रसारमाध्यमांकडून आणि सत्ताधारी पक्षाच्या गुलाम लोकप्रतिनिधींकडून याबाबत लोकलाजेपोटी सुद्धा योग्य हरकती घेतल्याचा अपवाद सुद्धा आढळू शकला नाही. विरोधी पक्षांनी त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार यावर लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न केला. परंतु निर्बुद्ध समाजाच्या बहुसंख्य मुर्खपणासमोर शहाणपणाचा प्रतिध्वनी तसा तुलनेने कमीच उमटला. शहाणा समाज विद्वानांच्या मार्गदर्शनाने पुढे जात असतो, सामान्य दर्जाचा समाज प्रतिमांच्या भरवशावर विश्वास टाकून जगत असतो पण निर्बुद्ध समाज मात्र हमखास आगीतून फुफाट्यातच जायला आतुर असतो.
काँग्रेस मुलभूत प्रश्न कधीही विचारणार किंवा लावून धरणार नाही. कारण संघाने टाकलेल्या आणि स्थापित केलेल्या सामाजिक राजकीय मुद्द्यांबाहेर जाण्याची कुवत आता काँग्रेसमधे उरली नाही. म्हणूनच युवराज आता सौम्य हिंदूत्वाचे पर्याय सातत्याने हाताळताना दिसत आहेत. वस्तुतः त्यांना नेहरूंच्या अर्धवट ढोंगी समाजवादाचा पण तरीही बराच यशस्वी झालेला समाजवादाचा पर्याय आणि ज्या महात्मा गांधींवर ते जास्त हक्क दाखवतात, त्यांचा त्याहून अधिक जनवादी पर्याय असतानाही, राहुलबाबांकडून काही केल्या नरसिंहराव मनमोहनसिंग आणि पवारांनी आणलेला जागतिकीकरणाचा वरवंटा फेकून ते ओझं झटकण्याची ताकद व दृष्टी नाही.
पण शेवटी जनतेचं एक सामुहिक शहाणपण नावाची गोष्ट अस्तित्वात असते, आणि त्याच्याच आधारे कसल्याही गर्तेत अडकलेला समाज हा चाचपडत का होईना परंतु मार्ग काढत असतो. आणि आम्ही डाव्यांनी नेमका यावर विश्वास ठेवून, त्या सामुहिक शहाणपणाला कसं जागं करत, संगठीत करत दिशा देता येईल, त्यावर फार परिश्रमपूर्वक आणि काळजीपूर्वक काम केले पाहिजे. त्याच अनुषंगाने या कोरोना आपत्तीत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आपण अजिबात आळस करता कामा नये. ते प्रश्न नक्कीच परिणाम करतील.
पैकी काही प्रश्न पुढीलप्रमाणे;-
1) जगात कोरोना संसर्गाचा परिचय डिसेंबर महिन्यातच झाला असताना आपले देशी 007 आणि हिंदकेसरी काय करत होते?
2) कोरोना ज्या हवाईमार्गानेच येण्याचा खुला विषय माहिती असूनही त्या मर्यादीत प्रवाशांपुरते का होईना, चाचणी व उपचार यंत्रणा केंद्र सरकारने का उभारली नाही?
3) जानेवारी फेब्रुवारी आणि जवळपास सगळा मार्च यांनी हलगर्जीपणा करून घालवला आणि देशाला कोरोना संकटात का ढकलले?
4) ट्रंपचा दौरा जनतेच्या आरोग्यापेक्षा मोठा होता का?
5)मध्यप्रदेशातील सत्ता मिळवणे हे सार्वजनिक आरोग्यापेक्षा महत्त्वाचे होते का?
6) ज्या त्या राज्यांचा विशेषतः देशाच्या उत्पन्नापैकी एक तृतीयांश उत्पन्न देणार्या आपल्या महाराष्ट्राचा जीएसटी परतावा का प्रलंबित ठेवला?
7) कोरोनाशी लढण्याऐवजी या काळात देशाच्या सार्वजनिक मालमत्ता श्रीमंत मित्रांच्या घशात घालण्याची कुःबुद्धी कशी काय सुचते?
8) केंद्राच्या गोदामात सडत असलेल्या 820 लाख टन धान्यापैकी गरिब मजुरांपर्यंत ते धान्य का पोचवलं नाही, का मजूरांना स्थलांतर करायची परिस्थिती निर्माण केली?
आणि
9) केंद्र सरकारच्या अधिकृत आपत्ती कोषाची घटनात्मक तरतूद असणारी कॅगच्या नियंत्रणाखाली असणार्या संस्था असतानाही, कॅगच्या नियंत्रणाखाली नसणारा एक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन का केला? ऑफिस ऑफ प्रॉफिट च्या नियमानुसार पंतप्रधानांना तात्काळ हकालपट्टी का होऊ नये? असे अनेक प्रश्न हिंदकेसरी मोती शेठला आधी विचारावेत.