स्वाती पेशवे
आता पूर्वीसारखं दिवाळीचं अप्रूप असलेली मोजकीच मनं पहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. पण काहीही असलं तरी हे प्रकाशपर्व विचारांच्या हिंदोळ्याला हलका झोका देऊन जाणारं आहे हे नाकारुन चालणार नाही. म्हणूनच या प्रसन्न, उल्हसित मनोवस्थेत काही गोष्टींचा विचार होणंही गरजेचं आहे. कदाचित विचारांची ही दिवाळी तेजरहित होऊ पाहणार्या मार्गावर प्रकाशाची तिरीप टाकून जाईल.
खरंच… दिवाळी म्हणजे लक्षदीपांचं विरघळणं… मोत्याच्या सरीसारखं सुखाने घरंगळत आपल्याकडे येणं, मायेचं-स्नेहाचं उटणं अंगावर माखल्यामुळे सतेज-सुगंधी होणं आणि भारतीय संस्कृतीतल्ल्या या सर्वात महान उत्सवपर्वात चिंब होणं… दरवर्षीची दिवाळी अशीच असते. तो सुखाचा हुंकार असतो, तृप्तीचा आल्हाददायी अनुभव असतो, समाधानाची ती सर्वोत्तम चौकट असते आणि अभिव्यक्तीची सर्वांगसुंदर संधी असते. नेहमीच्या धबडग्यातून बाहेर पडून आप्तस्वकियांसवे थोडा मोकळाढाकळा वेळ देणारा तो विसावा असतो. चार-पाच दिवसांच्या या सणदिवसांची आपली दीपावली असतेच पण विचारांच्या ज्योती तेवत्या ठेवण्याची ती पर्वणीदेखील असते. अशा अनेक कोंदणांमध्ये सजल्यामुळेच दीपावली अधिक साजिरी असते, असंही म्हणता येईल. दिवाळीमध्ये श्रमलेल्या, थकलेल्या माणसाला तणावमुक्तकरण्याची क्षमता आहे. तनामनावर सुखाचं आच्छादन घालणारी ममता आहे, जिभेबरोबर मनामध्येही गोडवा पसरवणारी ऋजूता आहे आणि मनाचे मनाशी ऋणानुबंध जोडणारी समरसता आहे. पूर्वीपासून दीपावलीचं हे देणं समाजाने स्विकारलं आणि सन्मानाने मिरवलं. एकमेकांशी संपर्क साधणं अवघड असण्याच्या पूर्वीच्या काळात याच दिवाळीनिमित्त लोक एकत्र आले. भावा-बहिणीची, लेकी-सुनांची, नातवंडा-पतवंडांची स्नेहभेट झाली. वर्षभर भाजी-भाकरीचा तुकडा मोडणार्या माणसांची रसना दिवाळीतल्या गोडाधोडाच्या जिन्नसांनी आणि चारी ठाव जेवणाने भागवली. एरवी जाड्या-भरड्या आणि टिकाऊ-मळखाऊ कपड्यांची सवय असणार्या कष्टकरी वर्गाला याच दिवाळीने मऊ-मुलायम स्पर्शाची आणि नानाविध रंगांची प्रावरणं लेण्याची मौज दिली.
दिवाळीने दारातल्या रांगोळीवर रंगांची पखरण केली, पणतीने अंधार्या कोनाड्यावरही दिवाबत्ती केली, आकाशदिव्याने अंधार्या अंगणात झिरमिळ्यांची नक्षी रेखली. एरवी मोजके डाग घालणार्या गृहिणींना दिवाळीने लक्ष्मीसारखं सजवलं आणि सोन्या-चांदीच्या स्पर्शाने मोहवून टाकलं. अर्थातच आता या सगळ्यासाठी दिवाळीची वाट पहावी लागत नाही. बदलत्या काळाने जगण्याचे संदर्भ बदलले आणि त्यानुरुप सणांद्वारे होणार्या संस्कारांनाही नवविचारांचा संसर्ग झाला. आता पूर्वीसारखं दिवाळीचं अप्रूप वाटणारी मोजकी मनं पहायला मिळण्याचीच शक्यता अधिक आहे. पण काहीही असलं तरी हे प्रकाशपर्व विचारांच्या हिंदोळ्याला हलका झोका देऊन जाणारं आहे हे नाकारुन चालणार नाही. म्हणूनच या प्रसन्न, उल्हसित मनोवस्थेत काही गोष्टींचा विचार होणंही गरजेचं आहे. कदाचित विचारांची ही दिवाळी तेजरहित होऊ पाहणार्या मार्गावर प्रकाशाची तिरीप टाकून जाईल… सध्या आपण यंत्र आणि तंत्राच्या जगातले रहिवासी आहोत. आधी आपण यंत्रं घडवली पण आता तंत्रज्ञान आपल्याला बिघडवत आहे. आपण त्याच्या हातातलं बाहुलं झाल्यासारखी परिस्थिती आहे. टू-जी, थ्री-जी, फोर-जीनंतर आता फाईव्ह-जीने आयुष्यात प्रवेश केला आहे. अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या एक-एक पिढ्या समृद्ध होणं हे माणसाच्या बौद्धिक प्रगतीचं द्योतक असलं तरी याच पिढ्या माणसाच्या पुढच्या पिढ्यांना भावनिकदृष्ट्या पंगू बनवत आहेत. सौहार्द, सद्भाव, सामाजिक समरसता आदी भावांपासून दूर नेत आहेत.
उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असणार्या गॅझेट्सचा वापर ही आता अपरिहार्य बाब असली तरी एखाद्या मायावी राक्षसासारखं त्याने आपलं विश्व आक्रमण्यास सुरूवात केली आहे. केवळ कामानिमित्त असणारा त्याचा वापर आता व्यापक झाला असून भावनांक विकसन, माहिती संकलन, स्मरण या मानवी क्षमतांवर त्याचा स्पष्ट प्रभाव दिसू लागला आहे. आता माणसं एकमेकांशी कमी आणि उपकरणांशी जास्त बोलतात, त्यांच्यासमवेत अधिक वेळ घालवतात. आता माणूस माणसात नव्हे तर या मायावी विश्वात अधिक रमतो. पण हे अनैसर्गिक आहे. कदाचित त्यामुळेच सर्व सुखांची लोलुपता असूनही आजचा माणूस एकाकी, सचिंत, निराश आणि सतत कोणत्या ना कोणत्या दहशतीखाली वावरतो आहे. जगण्यातली पूर्वीची निरामयता आता नाही. पूर्वीसारखा दिलखुलास संवाद नाही, कामाचे ठराविक तास संपल्यानंतर उरलेला वेळ छंद जोपासण्यासाठी, व्यासंग वाढवण्यासाठी कारणी लावण्याचा विचार नाही. त्यामुळे यंत्रांमधून निघणार्या साचेबद्ध वस्तूंसारखी ठराविक विचारांनी, ध्येयानं झपाटलेली माणसं दिसणं ही आजची वस्तुस्थिती बनली आहे.
उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या देशांची वाट धरलेल्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे अनेक घरांमधली दिवाळी मुला-बाळांच्या गजबजाटाविना उदासवाणी ठरत आहे. पालकांची परदेशस्थ नातलगांना दिवाळी फराळ पाठवण्याची लगबग पाहिली आणि या बाजारावर नजर टाकली तरी हा प्रश्न किती कळीचा आहे, याचा दाखला मिळेल. दुसरीकडे, घराघरातले तरुणच नव्हे तरमध्यमवयीन आणि काही अंशी वृद्धदेखील मोबाईलरुपी महाजालात पुरते बुडाले आहेत. गॅझेटप्रेमाचं हे व्यसन दिवसेंदिवस भयावह रूप धारण करत असून प्रत्यक्ष संवाद आणखी किती आक्रसणार, हा प्रश्न पडू लागला आहे. मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणार्यांची संख्या धोकादायक पद्धतीने वाढते आहे. कोणतंही व्यसन कधीच एकटं नसतं, ते अन्य काही सवंगड्यांना सवे घेऊन येतं. याच न्यायाने वाढती व्यसनाधिनता, वाढते सायबर गुन्हे, चिंताग्रस्तता, नैराश्य, एकटेपणामुळे जाणवणारी भीती या आणि अशा अनेक मानसिक आजारांनी ग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. म्हणजेच एकीकडे लोकसंख्या वाढतीये, सुखवस्तूंची उपलब्धता वाढतीय, ती खरेदी करण्याची अहमिका आणि आर्थिक कुवत वृद्धिंगत होतीये पण दुसरीकडे एकेकाळी स्वर्गासमान भासणार्या या संपन्न युगातल्या फुलांनी गंभीर जखमी होणार्या मनांची संख्याही वाढतीय. मात्र मज फुलही रुतावे… हा आता दैवयोग राहिलेला नसून तो कर्मयोग झाला आहे हेदेखील नाकारण्यात अर्थ नाही.
आधीचा कर्मयोग आपल्याला निरपेक्ष कर्म शिकवत होता. त्यात फळाची अपेक्षा धरु नका, असा विचार रुजवला जात होता. स्वत:बरोबरच जनकल्याणाचे संस्कार कळत नकळत केले जात होते. मुख्य म्हणजे हा कर्मयोग कोणत्याही हव्यासाविना होता. आता मात्र वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हव्यास संपत नाही. अधिक आणि अधिकापेक्षा अधिक मिळवण्याची पिपासू वृत्ती कोणत्याही वयोगटाला शांत झोपू देत नाही. सगळ्या अपेक्षांची पूर्तता होणं अशक्य आहे, हे ठाऊक असूनही माणूस सतत कोणत्या ना कोणत्या स्वप्नांमागे धावत राहू पाहतो, पण छाती फुटेपर्यंत धावताना आपल्या जगण्यातली नैसर्गिक प्रेरणा अखेरच्या घटिका मोजत असल्याची जाणिवही त्याला होत नाही. म्हणूनच आजघडीला अनेकांची रोजच दिवाळी साजरी होत असली तरी अंतरंगात दिव्यांची उधळण फार क्वचित बघायला मिळते. झगमगाट दिवाळीतच शोभून दिसतो. अत्तर-उटण्याच्या सुवासाला दिवाळीतल्या थंड हवेचा झोत हवा असतो, खरेदी केलेल्या वस्तूंना उत्सवपर्वानिमित्त उमटणारी हळदी-कुंकवाची दोन बोटं अधिक देखणं रुप देतात हे वास्तव आहे. पण साधेपणाच्या, संपन्नतेच्या, सहनशीलतेच्या, प्रतीक्षेनंतर मिळणार्या समाधानाच्या या भावना अनुभवण्याचा विचार आज दिसत नाही. बाजारात नव्यानं आलेली आणि आपल्याला भावलेली प्रत्येक गोष्ट दुसर्या क्षणी आपल्या हातात येण्यासाठी प्रसंगी ऋण काढलं जातं, पण हा वाढता ऋणभार कमी करण्याच्या नादात जगण्यातला निरामय आनंद कधी दबला जातो हेच अनेकांना समजत नाही.
प्रत्येकाला मर्जीने जगण्याचा अधिकार आहेच, तो कोणीही नाकारु शकत नाही. पण मर्जी नी मनमानी किती करायची, याची सीमारेषाही अधिक गडद व्हायला हवी. संपन्नता केवळ उंची राहणीमानाने नव्हे, तर उच्च विचारांमधूनही प्रतीत होते. आयुष्यभर अत्यंत साधेपणाने राहिलेले पण तुम्हा-आम्हा प्रत्येकाच्या जगण्यामध्ये रसनिर्मिती करुन गेलेले अनेक दिग्गज आठवा. अगदी परवाच कवयित्री शांत शेळके यांची जुनी मुलाखत पाहत होते. तेव्हा इतकं प्रगाढ, विदुषी, सौम्य आणि अत्यंत साधं व्यक्तिमत्त्व पुढच्या पिढीला पहायला तरी मिळेल का, अशी शंका मनाला स्पर्श करुन गेली. अर्थातच हे वानगीदाखल एक नाव आहे. अलिकडच्या काळात या पंक्तीत बसणारे अनेक दिग्गज आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांच्या सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीने आपल्या आयुष्यात खर्या अर्थाने रांगोळ्या रेखल्या होत्या, विचारांचे दीप प्रज्वलित केले होते, संवेदनांच्या तारा छेडल्या होत्या. जगण्याच्या वेगवेगळ्या आयामांची ओळख करुन दिली होती. काळाने पाडलेली अशी अनेक खिंडारं बुजवण्याची जबाबदारी आता नव्या पिढीवर आहे. कलेच्या सर्व दालनांमधले कंदील वात घेऊन येणार्या त्यांच्या हातांच्या प्रतीक्षेत आहेत. कर्कश्श गोंगाटाने बधिरता आलेल्या भावविश्वाला आता हळूवार स्वरांची आस आहे. या दिवाळीत अंतरीचा हा आवाज ऐकू या आणि जगण्याचा वेग थोडा कमी झाला तरी चालेल पण, जीवनेच्छा अधिक उन्नत करुन सणपर्वाचा आनंद लुटू या.