सोमनाथ कन्नर
कन्नर यांची मूळ पोस्ट
सगळेच सणवार ऍडोटाईजमध्ये बघून बघून साजरे करतांना दमछाक होतीये भेंडी. आपल्या अकरा खन धाब्याच्या मोडक्या भणंग वाड्याला कुणीकडून अन किती लायटिंगी लावाव्या जेणेकरून त्याचं बकालपण अंगावर येणार नाही? विशेष म्हणजे पायरी-पायरीवर, देवळी-देवळीत असे मोजून तब्बल शे-सव्वाशे दिवे लावायला शिकलो आम्हीही. ते किमान लक्ष्मीपूजन होईपर्यंत टिकावेत म्हणून तीन वेळा पावणेदोनशे रुपये किलोच्या गोडेतेलाने भरतोही. मग पावसात भिजून घुगर्या झालेल्या सोयाबीनला साडेबावीसशे रुपये क्विंटलने मोजून देणार्यांच्या घरात यायला लक्ष्मीला ठोकरा कोणत्या अधिकाराने लागतात?
आपल्या शहरी नातेवाईकाच्या घरून वानवळ्यात आलेल्या खुसखुशीत फराळाच्या चवीपुढं आपल्या खेडूत आईचा फराळाची चव अजिबात टिकाव धरत नाही, मान्यये. पण सोयाबीनच्या शेंगा टोचून अन कापसाच्या नख्यांमुळे चाळणी झालेल्या तिच्या हातापायांच्या भेगांमध्ये अजिंठा वेरूळ दिसतंय ते कमीये का? मग लाडू- शंकरपाळ्याचा आकार जमला नाही म्हणून काय फरक पडतोय. अन खुरप्याला झटून निबार घट्टे पडलेल्या तिच्या हातचा अनारसा कठीण होणार नाही तर काय नाजूक खुसखुशीत होईल होय? हा बेसिक धोरणी समंजसपणा आपोआप कुठून येतोय बे आमच्यात?
दिवाळीच्या किराण्यात मोती साबण घेण्याइतपत अधुनिकत्व गावागावापर्यंत पोहोचलं. पण कामाच्या गडबडीत त्याची आठवण काढायची फुरसत कुणाला आहे? शेवटच्याच्या अंघोळीवेळी लक्षात येतं ते पोतडीतूनच बाहेर काढायचं राहिलंय. आपण अंग पुसून न्हाणीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना येड्या माउलीला राहवत नाही. पिठाचा उंडा अन तव्यावरची पोळी तशीच सोडून गडबडीत ती साबण घेऊन न्हाणीत येते. परत देते तुला पाणी, लाव ही साबण म्हणून जबरदस्तीनं न्हाणीत बसवून तीचं आपल्या पाठीला साबण लावणं, बस यापेक्षा अधिक काय उरलीय आमच्यासाठी दिवाळी?
दिवाळीला हौशीने कुर्ता पायजमा घ्यायला आम्हीही शिकलो आता. पण तो घालताना येणारा अवघडलेपणा घालवणारी हिम्मत कुणाकडून उसनी घ्यावी? ऐन संध्याकाळच्या टायमाला जाणार्या लाईटमुळे ते अवसान येतं मग मिरवायला सोपं जातं. मग कशाला तक्रार असणार आहे त्या लोडशेडिंगबाबत आम्हाला?
बापाच्या आर्थिक स्थितीची कल्पना असल्याने यंदा आमचा हंगाम लांबलाय, भाऊबीजेला मुराळी येऊ नका, मी नंतर येईल कामं आवरली की हे बापाला/भावाला फोनवर सांगणार्या समंजस लेकीबाळीच्या पोटात कुण्या रानचा वणवा पेटत असेल आहे का कल्पना? अन दिवाळसणाला आली तरी बाजारातून नवी साडी न आणायला सांगता मायच्या पेटीतलीच एखादी साडी नेसून जाणार्या लेकीकडं बघून बापाला कौतुक वाटावं की स्वतःच्या लाचारीची कीव यावी?
मोदी यायच्या आधी म्हणजे 2014 च्या हंगामात 5 हजार रुपये क्विंटलने सोयाबीन विकून लग्न लावून दिलेल्या पोरीचं लेकरू 7 वर्षांचं होऊन पाहिल्या वर्गात गेलंय तरी सोयाबीन 5 हजारातच रांगतीये. त्या पोराने फटाक्याला पैसे मागू नये म्हणून किती वेळ त्या आज्याने लेकरू झोपी जाईपर्यंत घरी न जाता तोंड लपवत पारावरच बसून रहावं?
लय पिळताय बरं.. जरा माणसात या… लपायला जंगलं नाहीत म्हणून नक्षलवादी व्हायचं थांबलोय अशातला भाग नाहीये. कुठंतरी लोकशाही वगैरे भानगडींवरील विश्वासाची धुगधुगी बाकी आहे म्हणून आतड्याला पिळ देत सहन करतोय. अंत पाहू नका. एकदा का भडकलो न, तर ओलं-सुकं सगळंच भस्म करूनच शांत होऊ…
दिवाळीच्या आधीच्या दिवशी मी शेतकर्यांच्या परिस्थितीबाबत पोस्ट लिहली होती. खरंतर सणासुदीला असलं रडकं लिहणं काही तितकंसं योग्य नाही. कारण परिस्थिती सर्वांना माहितीये. मुद्दाम आनंदाच्या क्षणी त्याचा उल्लेख करून समोरच्याला विनाकारण अपराधी फील करून देण्यात काही हाशील नाही. संवेदनशील असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यामुळे त्रास झाला, त्यासाठी मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. ही एक प्रकारची हिंसाच आहे असं मला वाटतं.
दुसरी एक गोष्ट त्या पोस्ट नंतर घडली, ती म्हणजे अनेक जण माझ्या इनबॉक्समध्ये आले आणि त्यांनी अशा काही कुटुंबांना आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. पण हा त्यावरचा उपाय नसल्याने ते टाळलं. कारण हे व्यवस्थेचं अपयश आहे, त्यावर व्यवस्थात्मकच उपाययोजना अपेक्षित आहेत. उलट अशा मदतींमुळे प्रकरणाला वेगळं वळण येऊन शासनाच्या धोरणात्मक उदासीनतेकडे दुर्लक्ष होण्याचा धोका असतो. मदत, पॅकेज, अनुदान या असल्या गोष्टी समस्यांचं सुलभीकरण करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
शेतकरी समस्या विषय हा एवढा मोठा आहे, आणि तो इतका सातत्याने मांडला जातोय की लोकांनी त्याचं गांभीर्य विसरून तो कधीही न सुटणारा प्रॉब्लेम म्हणून स्वीकारून टाकलाय. जसं की एखादा पाय गमावल्यानंतर ती व्यक्ती एका पायावर नशिबाला दोष लंगडत का होईना चालतच जाते. त्यातल्या त्यात हा विषय मांडताना फार चुकीच्या पद्धतीने मांडला जातो. ही हक्काची लढाई न वाटता, लाचारीची मागणी जास्त वाटते. दुसरं म्हणजे या लढ्यात वापरली जाणारी भाषा, रूपकंही फारच लाचारी दर्शवणारी आणि विरोधाभासी आहेत. शेतकर्यांचा आमचा बाप वगैरे उल्लेख करणे, सरकारला मायबाप म्हणणे किंवा मग लगेच उलट बळीराजा, जगाचा पोशिंदा असला उल्लेख करणे.
खरंतर शेतकर्यांचा पोशिंदा असा उल्लेख करणे हाच सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. पोशिंदा म्हटलं की त्याच्यावर पोसण्याची जबाबदारी पडते. त्याला हक्क अधिकारांचं कवच उरत नाही. पोशिंदा त्याच्यावर अवलंबून असणार्यांना पोसण्याची किंमत करू शकत नाही, असा शिक्का त्याला आपोआप बसतो. शेती हा एक व्यवसाय आहे आणि त्यासंबंधी प्रत्येक व्यवहार हा योग्य आर्थिक मोबदल्याच्या पूर्ण झाला पाहिजे. पोशिंदा वगैरे व्याख्येत मोबदला शब्दाला तितकेसे महत्व उरत नाही. म्हणून पोशिंदा ही उपमा शेतकरी लढ्यातून बाद करणं गरजेचं आहे.
बर्याचदा, शेतकर्यांच्या लढ्यात सरकारऐवजी शहरी नागरिक हा मुख्य शत्रू म्हणून उभा केला जातो. त्याला मिळणारा पगार, सोयीसुविधा, किंवा इतर बाबी याचा उल्लेख करून हिनवलं जातं. त्यांनी एखाद्या बाबतीत महागाईवर भाष्य केल्यास लगेच शेतकरी मंडळी त्यांच्यावर चढाई करते. ग्राहक म्हणून त्यांना परवडणार्या किमतीत ती वस्तू मागणे हा त्यांचा अधिकार आहे. परवडत नसेल तर खाऊ नका हा आपला ऍटीट्युड परत आपल्याला बॅड व्यवसायिक म्हणून सिद्ध करतो. कारण आपण स्वतःला व्यवसायिक समजत नाही, पोशिंदा समजतो. आणि शहरी नागरिक त्यांच्या हक्काचं वेतन कमावतात, आणि ते थेट शेतकर्यांकडून माल घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर खापर फोडण्याचा काहीच संबंध नाही. हा लढा पूर्णपणे व्यवस्थेविरुद्ध आहे.
आणखी एक दुर्दैवी मुद्दा म्हणजे हा विषय मांडणं, ऐकणं अनेक जणांना आता नको वाटतयं. काहींनी त्याला पॉवर्टी पॉर्न या गटात ढकललं आहे. ही अवस्था अत्यंत घातक आहे. आपल्यातली संवेदना कितपत जिवंत आहे, हे एकदा आत्मपरीक्षण करून ठरवण्याची वेळ आलीये असं त्यांनी समजावं. मी त्या पोस्टमध्ये मांडलेले मुद्दे काहींना अतिरंजितही वाटले. काहींनी माझ्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करून परिस्थितीची तुलना केली. हो माझी आर्थिक परिस्थिती तुलनेने फार चांगली आहे. पण म्हणून मी लिहायलाच नको असं नाहीये ना. ज्यांचं ते वास्तव आहे त्या बिचार्यांना ते लिहण्याचे प्लॅटफॉर्म उपलब्ध नाहीत, किंवा तेवढं त्या शब्दात मांडता येत नाही. मला ते उपलब्ध आहे आणि जमतं म्हणून मी मांडतो तर काय बिघडतं. कोणत्याही वेदनेबाबत कुणीही बोलावं, मांडावं. आणि जे घडताना दिसलं, भोगलं त्याच गोष्टींचा उल्लेख मी लिहताना करतो. काल्पनिक लिखाणात केवळ सुख मांडता येतं, वेदना नाही. त्यामुळे अतिरंजित वगैरे वाटणार्यांबद्दल विशेष प्रेम. अनेकांनी त्या पोस्टनंतर आपण काहीच करू शकत नाही अशी हतबलता व्यक्त केली होती. तर त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची संधी आहे. शेतकर्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी हॅशटॅग मोहिम चालवली जातीये. खांद्याला खांदा लावून आपण सर्वजण त्यात सहभागी होऊ शकता. आज रात्री 11 वाजेपर्यंत तो हॅशटॅग चालवून त्यात सहभागी होऊ शकता. परत एकदा सांगणं आहे, ही दया याचना नाहीये. आमचा व्यवसाय धोक्यात आहे, तो सावरायला व्यवस्थेपर्यंत आवाज पोहोचवण्यास साथ द्या एवढंच…(फेसबुकवरुन साभार)