समीर मणियार
बालपणापासून अंगी स्वीकारलेला गांधीवाद त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तितक्याच ताकदीने जोपासला. गांधी विचार हा देशाला नव्हे तर जगाला तारु शकतो अशी त्यांची असीम निष्ठा होती. सामाजिक क्षेत्रातील अत्युच्च योगदानासाठी इला भट यांना केंद्र सरकारने पद्मश्री, पद्मविभूषण अशा मोठ्या सन्मान पुरस्काराने गौरविले होते.
भारतीय महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, गरीबांची उन्नती, शिक्षण क्षेत्रासाठी हयात वेचणार्या ज्येष्ठ गांधीवादी नेत्या, ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या आणि सेवा संस्थेच्या संस्थापक इलाबेन भट यांचे आज बुधवारी अहमदाबाद शहरात निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या. लोकशाही मूल्यांसाठी गांधीवादी मार्गाने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी या विदुषीने मोठे काम केले असून, त्यांच्या सामाजिक कार्याची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. गुजरातमधील लक्षावधी महिलांना त्यांनी आर्थिक बचत आणि अर्थकारणाची दिलेली शिकवण इतिहासात नोंदली जाईल.
या जगात अनेक नायक, नायिका आहेत. त्यापैकी इलाबेन भट ह्या एक नायिका आहेत. ज्यांनी भारतात कित्येक वर्षापूर्वी सेवा नावाची संस्था निर्माण केली. त्यातून घडलेले कार्य महान आहे, अशा शब्दात अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिटंन यांनी गौरव त्यांच्या कार्यचा गौरव केला होता. इलाबेन भट आपल्या आदर्श आहेत असे त्यांनी आवर्जून नमूद केलेले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात 07 सप्टेंबर 1933 रोजी अहमदाबाद शहरात जन्मलेल्या इला भट ह्या सहकारी चळवळीतील मोठ्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात. त्यांचे बालपण सुरत शहरात गेले. प्रसिद्ध वकिल सुमत भट आणि महिला अधिकार आंदोलनातील कार्यकर्त्या वनलीला व्यास या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या इला भट यांना स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेल्या त्यांच्या कुटुंबाचा मोठा वारसा होता. 1952 साली सुरतच्या एमबीटी महाविद्यालयात त्यांनी आर्टस शाखेत पदवी संपादन केली. 1954 साली अहमदाबाद शहरात त्यांनी कायद्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. हिंदू कोड बील या विषयातील असामान्य कामगिरीसाठी त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले होते. काही वर्षे त्यांनी मुंबईतील नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात इंग्रजीचे अध्यापन केले.
महाविद्यालयीन जीवनात बंडखोर विद्यार्थी नेते रमेश भट यांच्याशी त्यांची ओळख झाली. 1951 साली झालेल्या प्रथम जनगणनेच्या काळात शहरातील मैला व सफाई कामगारांच्या वस्तीतील उपेक्षित कुटुंबांची राहणीमानाची पाहणी करण्यासाठी रमेश भट यांनी आग्रह केल्यानंतर त्या काही क्षण अस्वस्थ झाल्या होत्या. एका युवकांसोबत नरकयातनेचे जीवन जगणार्या झोपडपट्टीत इला भट यांनी फिरणे हे त्यांच्या माता पित्यांना मान्य नव्हते. इला भट आणि रमेश भट यांच्या विवाहाला घरातून विरोध झाला. पण विवाहाच्या निर्णयाशी त्या ठाम होत्या. 1955 साली विवाह झाल्यानंतर इला भट यांनी कापड गिरणी कामगार संघाला जोडून घेऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकले. कामगार चळवळीत खासकरुन कामगार संघटनांच्या नेतृत्वात पुरुषप्रधान मानसिकता दिसते.
देशातील महिलांनी स्थापन केलेली पहिली कामगार संघटना ही अनुसया साराभाई यांची होती. त्या कापड गिरणी कामगार संघात इला भट यांनी दणक्यात नेतृत्व केले. अहमदाबाद शहरात 1971 च्या सुमारास बाजारपेठेत हातगाडी ओढणार्या आणि डोक्यावर ओझे वाहून हमाली करणार्या महिलांना हक्काच्या निवारा मिळण्यासाठी इला भट यांना साद घातली. अत्यंत कमी पैशात मोलमजुरी करुन उघड्या आकाशाखाली जीवन जगणार्या महिलांच्या कामास त्यांनी जीवनातील प्राधान्य देण्याचा निश्चय केला.
महिला कामगारांच्या आर्थिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवून त्यांनी गुजराथी वृत्तपत्रात लेख लिहिले. त्याचा कापड व्यापार्यांनी प्रतिवाद केला. यातून 1972 साली इला भट सेल्फ एम्पॉलाईड वुमेन्स असोसिएशन ीशुर सेवा नावाच्या संस्थेची स्थापना केली. आणि सेवाचे काम हीच त्यांची देशात ओळख बनली.
सेवा संस्थेचे 12 लाखाहून अधिक महिला सदस्य आहेत. 1972 साली त्यांनी सेवा सहकारी बँकेची निर्मीती केली. कष्टकरी, श्रमिक, महिला आणि कामगारांच्या अनेक प्रश्नांना इलाबेन यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासंगी अभ्यासाच्या जोरावर वाचा फोडली. महिलांचे हक्क, अधिकार यासाठी लोकशाही गांधीवादी मार्गाने संघर्ष केला. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी त्यांनी केलेले अजोड कार्य लोकांच्या कायम स्मरणात राहील. महिलांना हक्काचे घर, बचत, पेन्शन, विमा पॉलिसीचे संरक्षण, मुलांची देखभाल यासह कायदेशीर सल्ला व मदत देण्याचे मोठे काम त्यांनी केले. मेहसाणा जिल्ह्याती उपेक्षित दलित महिलांच्या उन्नतीसाठी वनलक्ष्मी योजनेच्या सहाय्याने केलेले काम वर्णातीत आहे. पावसाच्या वाहून जाणार्या पाण्याचा वापर करण्यासाठी अभिनव प्रयोग त्यांनी प्रत्यक्षात साकारला. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या क्षेत्रात मोठे काम करताना भूमीहीन महिलांना त्यांनी शेतीसाठी जमीन देण्यास सरकारला भाग पाडले.
श्रमजीवी महिलांना संघटनेच्या माध्यमातून महिला पाणी पंचायत निर्माण करण्याचे काम करुन पाण्याचे मालक महिलांना करण्याचे त्यांनी काम केले. यासाठी त्यांना काही दशके संघर्ष करावा लागला. महिला वर्गाला पाणी आणि जमीन मालकीचा अधिकार मिळाल्यामुळे गावागावातील पुरुषप्रधान संस्कृतीची जळमटे दूर होण्यास मदत झाली. गुजरातच्या काही भागात निर्माण होणारे संभाव्य वाळवंट रोखण्याचे त्यांनी काम केले. बनासकांठा व अन्य जिल्ह्यात 35 लाखांहून अधिक विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांचे वनीकरण करुन त्यांनी हरित प्रदेश करण्यात मोठी भूमिका निभावली. रोजी रोटीसाठी स्थानिकांना अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याची नामुष्की रोखण्याचे काम त्यांच्या कार्यातून झाले. गावे समृद्ध झाली. या सार्या सकारात्मक कामाच्या उर्जेचे बळ त्यांना गांधीवादी विचारांच्या बाळकडू यातून मिळाले.
बालपणापासून अंगी स्वीकारलेला गांधीवाद त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तितक्याच ताकदीने जोपासला. गांधी विचार हा देशाला नव्हे तर जगाला तारु शकतो अशी त्यांची असीम निष्ठा होती.
सामाजिक क्षेत्रातील अत्युच्च योगदानासाठी इला भट यांना केंद्र सरकारने पद्मश्री, पद्मविभूषण अशा मोठ्या सन्मान पुरस्काराने गौरविले होते. 1977 साली रेमन मॅगसेसे पुरस्कार, 1986 साली राईट लाइव्हलीहूड सन्मान, याशिवाय जगातील अनेक मान्यवर विद्यापीठांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली होती.
राज्यसभा खासदार आणि केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य या नात्याने त्यांनी काही काळ काम केलेले आहे. सुमारे 10 लाखांहून अधिक गरीब महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी, भारतीय महिलांचे आर्थिक सक्षमीकरणाच्या कार्यासाठी तत्कालीन अमेरिकन परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिटंन यांच्या हस्ते इलाबेन यांना ग्लोबल फेअरनेस अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते.
गरीब कष्टकरी महिलांना सन्मानाने जगता यावे. त्यांना त्यांच्या कष्टातून आर्थिक पायावर स्वावलंबी उभे राहता यावे. यासाठी इला भट या विदुषीने केलेले काम सार्या जगाने पाहिले आहे. महिलांना संपूर्ण रोजगार याचा अर्थ केवळ नोकरीच नाही. तर अन्न सुरक्षा, सामाजिक सुरक्षासुद्धा असायला हवीच आहे अशी त्यांची धारणा होती. भारतीय महिलांना सन्मानाचे जगणं जगण्यासाठी प्रचंड ऊर्जा देणार्या या गांधीवादी विचारांच्या महान विदुषीला विनम्र अभिवादन.
(फेसबुकवरुन साभार)