डॉ. संजय कळमकर
जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमधल्या मूल्य र्हासाच्या जाणिवेने व्यथित होणारे प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले मूल्याधिष्ठित पुरोगामी सामाजिक जाणीव प्रकट करणारं लेखन करत. व्यक्तिमत्वात निर्माण होणार्या सुखदु:खात्मक भावतरंगांचं उत्कट आणि हळुवार चित्रण करणारं लेखनही त्यांनी केलं. सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थित्यंतरांमधून निर्माण झालेले प्रश्न आणि त्यातून निर्माण होणार्या कधी सफल तर बहुतेक वेळा विफल ठरणार्या संघर्षांचं समर्थपणे केलेलं वास्तवदर्शी चित्रण हा ही कोत्तापल्ले सरांच्या कथात्मक लेखनाचा उल्लेखनीय विशेष आहे. सामाजिक वास्तवाचं सजग भान असणारा हा लेखक; त्यामुळे समकालीन समाजजीवनाचं अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारं प्रत्ययकारी चित्रण करण्यात ते यशस्वी ठरले. कोत्तापल्ले सर 1960 नंतरच्या काळातले महत्त्वाचे मराठी साहित्यिक. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मय प्रकारांमध्ये दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणार्या सरांचा जन्म नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड या गावी झाला. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण देगलूरला तसंच मराठवाडा विद्यापीठात झालं. ज्या विद्यापीठात शिकले, शिकवलं, त्याच विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. बी. ए. आणि एम. ए. या दोन्ही परीक्षांमध्ये ते विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यासाठी त्यांना अनुक्रमे डॉ. नांदापूरकर आणि कवीवर्य मायदेव हे प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार मिळाले. एम. ए (मराठी) परीक्षेत ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. कुलपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले.
1971 ते 1977 या काळात बीड इथल्या महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रथम अधिव्याख्याता आणि नंतर प्रपाठक या पदांवर त्यांनी काम केलं. 1996 ते 2005 या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. 2005 पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) आणि साहित्य अकादमी (दिल्ली) या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिलं. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (1988-1989), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष (1995-1997), पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, धारवाड, बनारस हिंदू विद्यापीठ, म. स. वि. वडोदरा इत्यादी विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. 1999 मध्ये श्रीगोंदे इथे झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि 2005 मध्ये जालना इथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
‘मूड्स’ हा कवितासंग्रह; ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ हे कथासंग्रह; ‘राजधानी’ हा दीर्घकथांचा संग्रह; ‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ या कादंबर्या; ‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य: स्वरूप आणि बोध’, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता: एक दृष्टिक्षेप’, ‘साहित्याचा अवकाश’ हे त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ प्रकाशित. याशिवाय ‘गावात फुले चांदणे’ (प्रौढ नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी), ‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’, ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’ (ललित गद्य), ‘जोतीपर्व’ या त्यांच्या साहित्यकृती आणि काही अनुवादित पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. ‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकर्यांचा आसूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ इत्यादी पुस्तकांचं संपादन त्यांनी केलं. कोत्तापल्ले सरांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यांच्या समीक्षा लेखनातही सामाजिक जाणिवेतून केल्या जाणार्या विश्लेषणाला महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात मोठं काम असलेल्या कोत्तापल्ले सरांचं पुण्यात निधन झालं. 15 दिवसांपासून त्यांची मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच त्यांच्यासंबंधीच्या अनेक आठवणी, प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले.
मराठी साहित्यक्षेत्रातलं कोत्तापल्ले यांचं योगदान उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातून आलेल्या आमच्यासारख्यांनी काही लिहिलं, तर त्याचा त्यांना मोठा अभिमान वाटे. केवळ एक लेखक नाही तर ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशीही त्यांची ओळख आहे. विशेषत: घरापासून शिक्षणासाठी दूर एकटं रहाणार्या विद्यार्थ्यांविषयी त्यांना विशेष कळवळा होता. कोत्तापल्ले 1969 ते 1971 दरम्यान पदव्युत्तर शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत नोकरीही केली होती.
नोकरीतून मिळणार्या पैशांवर ते स्वत:चा शैक्षणिक आणि वैयक्तिक खर्च चालवत असत. नोकरी करून शिक्षण घेतल्यामुळं त्यांना गावातून, घरापासून लांब राहून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या अडचणी चांगल्याचमाहिती होत्या.
या विद्यार्थ्यांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पैशांची. नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी, अशा विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी आणि घरापासून लांब राहणार्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या मानधनात वाढ करून घेतली. ही वाढ विद्यार्थ्यांसाठी फार गरजेची होती. अनेक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळेच, कोत्तापल्ले यांना त्यांचे विद्यार्थी लेखक किंवा विचारवंत म्हणून नाही तर ‘कोत्तापल्ले सर’ म्हणूनच जास्त चांगल्या प्रकारे ओळखतात.
86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सरांनी भूषवलं. त्यांच्या विद्रोही स्वभावाविषयी बोलायचं झालं तर, आणीबाणीच्या काळात राज्य शासनाने जाहीर केलेला पुरस्कार त्यांनी नाकारला होता. सुप्रसिद्ध कवी, लेखक, व्यंगचित्रकार आणि संवाद लेखक शरद जोशी यांनी जागतिकीकरणाचं समर्थन केलं, त्या वेळी कोत्तापल्ले यांनी त्यांचा जोरदार विरोध केला होता. कोत्तापल्ले यांनी नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बाल पुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष पदावर काम केलं होतं. 1995 -96 मध्ये ते साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी वैविध्यपूर्ण काम केलं होतं. मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यातलं आठवं ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे इथलं साहित्य संमेलन, पुण्यातलं पहिलं औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन, 2003 मधलं राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन इत्यादी संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी भूषवली आहेत. मराठी विषयाची केवळ आवडच नाही, तर मराठीशी समरस होऊन गेल्याची अनेक उदाहरणं त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यातून दिसतात. मराठी माणूस आणि त्याभोवती फिरणारं रोजचं कटकटीचं जीवन यापलीकडे जाऊन लेखन करणारा हा लेखक. 1972 च्या दुष्काळानंतर समाजमनावर झालेला आर्थिक आघात चितारताना ग्रामीण भागासह शहरातले गरीब, दलित, शेतकरी, पीडितांना सहन कराव्या लागणार्या यातना साहित्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणार्या मोजक्या साहित्यिकांमध्ये त्यांचा समावेश होतो. साहित्याला वास्तव जीवनाची झालर लागलीच पाहिजे, अशी त्यांची भावना होती आणि ती त्यांच्या लेखनातून आली. संघटनेत काम करणार्या एखाद्या कार्यकर्त्याचं घर कार्यकर्त्यांनी नेहमी गजबजलेलं असतं. सरसुद्धा मार्क्सवादी आणि समाजवादी विचारसरणीचे पाईक होते. केवळ व्यक्ती म्हणून नाही, तर त्यांच्यामध्ये असणारी आपुलकी आणि मायेचा झरा हा किती नितळपणे वाहतो, याची अनेक उदाहरणं आहेत. त्यांच्या निधनाने एका चांगल्या साक्षेपी समीक्षकाला आपण पोरके झालो आहोत.