जयंत माईणकर
2008 साली दक्षिणेत भाजपला सत्तेचा दरवाजा उघडून देणारे आणि चार वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एकूण पाच वर्ष सत्तर दिवस कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद सांभाळणारे बी एस येडीयुराप्पा वयाच्या 78 व्या वर्षी अखेर पायउतार झाले आणि त्यांच्या जागी बसवराज बोम्मई 61 वर्षीय पूर्वाश्रमीच्या जनता दल नेत्याला बसवण्यात आले. बसवराज बोम्मई, हे माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांचे पुत्र. दोन वेळा विधानपरिषदेचे जनता दलाकडून आमदार राहिलेल्या बसवराज यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर लगेच भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2008 पासून ते आतापर्यंत भाजपचे आमदार आहेत. येडीयुराप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे बसवराज हे त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. येडीयुराप्पा आणि बोम्मई दोघेही कर्नाटकातील राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि लोकसंख्येच्या 20 टक्के असलेल्या लिंगायत समाजाचे. अर्थात भाजपने एका लिंगायत समाजाच्या नेत्याला बदलून दुसर्या लिंगायत नेत्यालाच आणण्याचं राजकारण खेळलं आहे. पण हे करताना दुसर्या पक्षातून आलेल्या नेत्यालाच प्रमुख पद देऊन आपल्या पक्षातील जुन्या नेत्यांवर अन्याय केला आहे. आणि बोम्मई यांची निवड करताना ज्या घराणेशाहीला भाजप विरोध करत आहे ती घराणेशाहीच कायम ठेवली आहे. अशीच घराणेशाही कायम राखण्यास भाजपने हरयाणात मदत केली आहे. दुष्यंत चौटाला यांना देविलाल यांचे पणतू भाजपच्या सहाय्याने आज उपमुख्यमंत्री आहेत. पण भाजप नावाच्या तथाकथित गंगेत घराणेशाहीपासून भ्रष्टाचारापर्यंत सर्वच आरोप धुतले जातात. हीच घराणेशाही कायम ठेवत महाराष्ट्रात डॉ. सुजय पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांनाही कमळाच्या विशाल छायेत घेतलं गेलं. आपल्या पक्षातील 75 वर्षाच्यावरील लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, बाबूलाल गौर यांच्यासह अनेक नेत्यांना सक्तीने सेवानिवृत्त होण्यास भाग पाडणार्या मोदी – शाह ही गुजराती जोडी येडीयुराप्पा यांच्या बाबतीत बरीच ‘सॉफ्ट’ राहिली. त्याच कारण होतं मुख्यत्वे उत्तर भारतातील ब्राम्हण, बनिया समाजाचा पक्ष म्हणून गणले जाणार्या पक्षाला त्यांनी दक्षिणेत सत्तेचा दरवाजा उघडून दिला. अगदी नितीन गडकरी यांनाही येडीयुराप्पा यांच्याबद्दल ‘सॉफ्ट’ कॉर्नर होता. आणि म्हणून त्यांच्या मुलगी, जावई, मुलगा यांच्यावर भ्रष्टाचाराचे, जमिन हडपण्याचे आरोप झाले. तरीही भाजप हायकमांड त्यांना संरक्षण देत राहिली. हे आरोप मोदींच्या अत्यंत जवळच्या असलेल्या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल यांच्यावरही झाले होते. पण त्यांना 75 वर्षाच्या झाल्या म्हणून हटविण्यात आले आणि लगेच मध्यप्रदेश आणि आता उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी बसविण्यात आलं. येडीयुराप्पा यांचं तसंच पुनर्वसन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मुख्यमंत्री पदावर अनुक्रमे तीन आणि दोन वर्षासाठी बसण्याआधी वादग्रस्त परिस्थितीत ऑपरेशन कमलच्या साह्याने दोन वेळा मिळून 25 हून अधिक विरोधी आमदारांचे राजीनामे घेऊन त्यांना पुन्हा भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले गेले. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला जातो. फेमस ऑपरेशन कमलची सुरुवात 2008 साली कर्नाटकपासून झाली असे म्हणण्यास हरकत नाही.अर्थात राजीनामा देण्याआधी खास प्लेनने दिल्लीत जाऊन शिमोग्याचा खासदार असलेल्या आपल्या मुलाला बी एस राघवेंद्रला केंद्रीय मंत्रिमंडळात सामिल करण्यासाठी प्रयत्न केला होता. पण मोदी -शाहनी त्यांचं म्हणणं मानलं नाही. मुलाऐवजी त्यांनी शोभा करंदलाजे यांचा कृषिराज्यमंत्री म्हणून समावेश केला. शोभाक्का म्हणून कर्नाटकात प्रसिद्ध असलेल्या या महिला येडीयुराप्पा यांच्या अतिशय निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे मुलगा नाही तरी येडीयुराप्पा यांच्या निकटवर्तीयलाच मोदींनी मंत्रिमंडळात घेतलं. लिंगायत समाज हा एकूण लोकसंख्येच्या सुमारे 20 टक्के तर वोक्काळीग समाज एकूण लोकसंख्येच्या सुमारे 18 टक्के प्रमाणात कर्नाटकात आहे. देवेगौडा वोक्काळीग समाजाचे. त्यामुळे कर्नाटकात सत्तांतर घडवताना जात, परिवारवाद आणि ज्येष्ठता या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. कर्नाटकात आत्तापर्यंत दोन पिता पुत्र मुख्यमंत्री झाले. देवेगौडा-कुमारस्वामी आणि एस आर बोम्मई आणि बसवराज बोम्मई. संपूर्ण देशात आत्तापर्यंत 15 राजकीय परिवाराने दोन किंवा त्याहून अधिक मुख्यमंत्री दिले आहेत. तर काही ठिकाणी मुलांना उपमुख्यमंत्री पद मिळालं. जम्मू काश्मीरच्या अब्दुल्ला परिवाराने आत्तापर्यंत तीन मुख्यमंत्री दिले. याबरोबरच मुलायसिंग-अखिलेश (उत्तर प्रदेश), लालूप्रसाद-राबडी देवी-तेजस्वी (बिहार)शंकरराव-अशोक चव्हाण (महाराष्ट्र), रवीशंकर-शामा चरण शुक्ल (मध्य प्रदेश) प्रकाशसिंग -सुखबिरसिंग बादल (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पंजाब) बिजू-नविन पटनायक (ओडिशा), करुणानिधी -एम के स्टॅलिन (तामिळनाडू)वाय एस आर रेड्डी – जगनमोहन रेड्डी (आंध्र-तेलंगाणा) शिबू-हेमंत सोरेन (झारखंड),दोरजी-प्रेमा खंडू (अरुणाचल प्रदेश), पी ए -कोनराड संगमा (मेघालय)हे ते पिता पुत्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री. असो!
भाजपने याआधीही मुख्यमंत्री बदल केला आहे. दिल्लीत मदनलाल खुराणा याना बदलणं त्या पक्षाला फायदेशीर ठरल नाही तर मध्य प्रदेशात आडवाणी यांच्यासह कैलाश जोशी, सुंदरलाल पटवा कोणालाही न जुमानणार्या उमा भारती यांच्या जागी प्रथम बाबूलाल गौर नंतर शिवराजसिंग चौहान आणले. गुजरातमध्ये केशुभाई पटेल यांच्या जागी नरेंद्र मोदींना आणलं. खुराणा आणि पटेल दोघांनीही हायकमांडकडे आपली नाराजी नोंदविली होती. सध्या छत्तीसगड चे 15 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले रमणसिंग आणि मध्य प्रदेशचे 14 वर्षे मुख्यमंत्री असलेले शिवराजसिंग चौहान हे नरेंद्र मोदींच्या खालोखाल ज्येष्ठ असलेले 62 वर्षीय शिवराजसिंग तर 68 वर्षांचे रमणसिंग आहेत. मोदींना किंवा कोणत्याही हुकूमशाहला शक्तिशाली विरोधक आवडत नाही.चौहान आणि मोदी यांचे संबंध फार चांगले नाहीत. त्यामुळे पुढील वर्षी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकानंतर मोदी-शाह आपलं लक्ष मध्य प्रदेशावर केंद्रीत करू शकतात. त्याजागी कदाचित शाह यांचे विश्वासू आणि पक्षाचे महासचिव कैलास विजयवर्गीय किंवा ओम बिरलाप्रमाणे एखाद्या ‘सरप्राईज’ नावाची वर्णी लागू शकते. तूर्तास इतकेच!