लक्षणे दिसल्यास तपासणी करण्याचे आवाहन; शून्य कुष्ठरुग्ण प्रसाराचा निर्धार
| रायगड | प्रतिनिधी |
केंद्र शासनाने 2027 पर्यंत देशाला ‘शून्य कुष्ठरुग्ण प्रसार’ करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील वीटभट्टी कामगार, खाण कामगार, स्थलांतरित मजूर, बांधकाम मजूर, आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी तसेच कारागृहातील कैदी अशा वंचित घटकांची प्रत्यक्ष शारीरिक तपासणी केली जात आहे.
कुष्ठरोग आता ‘नोटिफायबल डिसीज’
कुष्ठरोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने याला ‘नोटिफायबल डिसीज’ जाहीर केले आहे. आता खासगी रुग्णालये किंवा डॉक्टरांकडे कुष्ठरुग्ण आढळल्यास त्याची माहिती सरकारला देणे कायद्याने बंधनकारक आहे. माहिती लपवणाऱ्यांवर कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य माहिती देण्याचे आवाहन होत आहे.
वेळीच निदानाने होतो बरा
कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा रोग आहे. मात्र, त्यावर वेळीच निदान व उपचार होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात कुसुम या अभियानांतर्गत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी रोगाची माहिती न लपविता पुढाकार घ्यावा, वेळीच उपचारासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
आजाराची लक्षणे
त्वचेवर फिकट, तांबूस किंवा तेलकट चट्टा असणे. चट्टा असलेल्या ठिकाणी स्पर्शज्ञान नसणे किंवा घाम न येणे. हातापायांच्या नसा जाड होणे किंवा हातापायांत मुंग्या येणे. हातापायांतील ताकद कमी होणे.
2027 पर्यंत शून्य प्रसार उद्दिष्ट
केंद्र शासनाने 2027 वर्षापर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याचे लक्ष्य ठरविले आहे. यासाठी नवे रुग्ण शोध मोहिमेसोबतच जनजागृती केली जात असून, नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण पूर्णपणे थांबवण्याचे नियोजन आहे.
कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरीयम लेप्री या जंतुमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, परिघीय नसा, डोळे आणि इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो. या आजाराबद्दल समाजात अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव कायम आहेत. लवकर निदान न झाल्यास आणि उपचारात विलंब झाल्यास रुग्णांमध्ये विकृती निर्माण होते. त्यामुळे वेळेत निदान आणि संपूर्ण औषधोपचार हे कुष्ठरोग नियंत्रणाचे प्रमुख घटक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने सन 2027 पर्यंत कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र हे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये संसर्गाची साखळी पूर्णपणे तोडणे, प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण शून्य करणे आणि कुष्ठरुग्णांविषयी समाजातील भेदभाव नष्ट करणे या बाबींचा समावेश आहे. सद्यस्थितीत, सप्टेंबर 2025 अखेर राज्यात 7,863 नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे.







