| ठाणे | प्रतिनिधी |
मुंबईकडे जाण्यासाठी कर्जतहून अनेक जलद रेल्वे गाड्या धावतात. कर्जत पासून बदलापूर पर्यंत अनेक प्रवासी या रेल्वे गाड्यांवर अवलंबून असतात. गुरुवारी (दि.6) सकाळी मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड स्थानक ते कर्जत रेल्वे स्थानकाच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे या रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला.
या बिघडाचा परिणाम दुपारपर्यंत कायम असल्याचे दिसून आले. या तांत्रिक गोंधळामुळे डेक्कन क्विन, इंद्रायणी, सिंहगड, इंटरसिटी एक्सप्रेस आणि इतर एक्सप्रेस कल्याण ते नेरळ दरम्यान जागोजागी थांबून ठेवण्यात आल्या आहेत. या गोंधळाचा कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या रेल्वे मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. सकाळीच पुणे येथे जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे या तांत्रिक गोंधळात हाल झाले. या गोंधळामुळे काही प्रवाशांनी कर्जत भागात जाण्यासाठी कल्याण, बदलापूर येथून एसटी बस, खासगी वाहन सेवेतून प्रवास सुरू केला होता. या गोंधळामुळे शाळेत, महाविद्यालयात तसेच कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. कर्जतहून मुंबईकडे जाणारी 9 वाजून 45 मिनिटांची जलद लोकल गाडी रद्द करण्यात आली होती. तर कर्जत हून मुंबई कडे जाणारी 10 वाजून 43 मिनिटांची जलद लोकल गाडी अर्धा तास उशिराने धावत होती. तर अनेक कर्जत कडे जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या भिवपुरी स्थानकापर्यंत चालवण्यात येत होत्या.







