| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील उसर येथे गेल कंपनीचा करोडो रुपयांचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयदेखील उसरमध्ये बांधले जाणार आहे. प्रकल्प येत असताना स्थानिकांना रोजगार, ठेका मिळण्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, पर्यावरणाचा विचार करणे गरजेचे आहे. प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, असे शेकाप राज्य मीडिया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
बेलकडेपासून सुडकोलीपर्यंतच्या प्रमुख शेकाप कार्यकर्त्यांची बैठक खानाव येथील प्रणित पाटील यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. यावेळी शेकापचे विभागीय चिटणीस मोहन धुमाळ, कावीरचे सरपंच राजेंद्र म्हात्रे आदींसह वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते.
उसर येथील गेल कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून नव्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात स्थानिक कामगार फक्त बोटावर मोजण्याइतके आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळेल, या आशेने पिकत्या जमिनी प्रकल्प उभारणीसाठी दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या म्हणून प्रकल्प उभे राहात आहेत. उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधले जाणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या जागी भराव करण्यात आला आहे. या भरावामुळे आजूबाजूला असलेली भातशेती नापिक होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतामध्ये पाणी जाऊन भातपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे प्रकल्प उभारत असताना स्थानिकांना डावलेले जात असल्याची माहिती चित्रलेखा पाटील यांना उपस्थित कार्यकर्त्यांनी दिली. या प्रकल्पांमुळे आजूबाजूच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, प्रदूषणाचा प्रश्नदेखील भेडसावू लागला असल्याचे सांगितले. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले, शेतकरी कामगार पक्षाने कायमच गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगारांना केंद्रबिंदू ठेवून काम केले आहे. त्यांच्या न्याय्य हक्कासाठी अनेक यशस्वी लढे दिले आहेत. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, ही शेतकरी कामगार पक्षाची भूमिका राहिली आहे.
गेल कंपनीत सुरु असलेल्या कामांबरोबरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांचा ठेका स्थानिकांना देणे गरजेचे आहे. स्थानिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध केले पाहिजे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये नोकरी, रोजगार देण्यायोग्य प्रशिक्षण, शिक्षण देण्याची जबाबदारी शासन आणि कंपनी प्रशासनाची आहे. बाहेरील कामगारांना रोजगार देण्याअगोदर स्थानिकांना प्राधान्याने नोकरी द्या. प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण, तसेच स्थानिकांना शैक्षणिक, आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी शेतकरी कामगार पक्षामार्फत संघर्ष समिती गठीत केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून स्थानिकांना गेल कंपनीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी देण्यासाठी लढा दिला जाणार आहे. गावोगावी बैठका घेऊन सर्व घटकाला एकत्र आणून स्थानिकांच्या न्याय्य हक्कासाठी समितीमार्फत आंदोलन केले जाणार आहे. कंपनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे, स्थानिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. स्थानिकांना आरोग्य, शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याच पाहिजे या भूमिकेतून संघर्ष समिती काम करणार असल्याची ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली. त्यांच्या या लढ्याला उपस्थितांनी पाठिंबा देत न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार, असा विश्वास व्यक्त केला.