अरुंद रस्त्यांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल, बेशिस्त चालकांमुळे कोंडीत भर
| पाली | प्रतिनिधी |
शनिवारी आणि रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास नको रे बाबा! अशी संतप्त आणि उद्विग्न प्रतिक्रिया सध्या महामार्गावरून प्रवास करणारे पर्यटक व चाकरमान्यांकडून उमटत आहे. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच वीकेंडला या महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढते. शनिवारी व रविवारी देखील महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव शहरात वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
बेशिस्त वाहन चालकांमुळे कोंडीत आणखीन भर पडते पळस्पे ते इंदापूर दरम्यान रखडलेली कामे आणि अरुंद रस्त्यांमुळे प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. इंदापूर व माणगाव बायपासचे काम अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. परिणामी, महामार्गावरील संपूर्ण वाहतूक अजूनही इंदापूर आणि माणगाव शहराच्या मुख्य बाजारातूनच सुरू आहे. शनिवार-रविवारी पर्यटकांच्या आणि चाकरमान्यांच्या गाड्यांची संख्या वाढताच या दोन्ही शहरांना
वाहतूक कोंडीचा मोठा विळखा बसत आहे. पळस्पे ते इंदापूर या 84 किमीच्या टप्प्यात नागोठणे, कोलेटी आणि कोलाड येथील पुलांची कामेही अजून पूर्णत्वाकडे गेलेली नाहीत. परिणामी केवळ एकाच बाजूची लेन सुरू असल्याने आणि रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने वाहनांचा वेग कमालीचा मंदावतो. या महामार्गावर कर्नाळा, रामवाडी, कोलेटी आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा फटका बसतो.
बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भरइंदापूर व माणगाव शहरात तसेच शहराच्या अलीकडे आणि पलीकडे महामार्गाचा रस्ता अत्यंत अरुंद आहे. अशा संवेदनशील ठिकाणी अनेक बेशिस्त वाहनचालक संयम न राखता, आपल्या ठरलेल्या लेनमध्ये न राहता लेन सोडून चुकीच्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. परिणामी, समोरून येणाऱ्या गाड्यांना जाण्यासाठी जागाच उरत नाही आणि दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. वाहनचालकांच्या या बेशिस्तपणामुळे आधीच असलेल्या वाहतूक कोंडीत आणखी भीषण भर पडत आहे. आता मे महिना संपत आला असून प्रशासनाने दिलेली ‘डेडलाईन’ जवळ आली आहे. जर पावसाळ्यापूर्वी हे बायपास आणि पुलांचे काम युद्धपातळीवर पूर्ण झाले नाही, तर आगामी पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास अधिक धोकादायक आणि त्रासदायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाहतूक पोलीस तैनात
या ठिकाणी शहरात वाहतूक पोलीस तैनात असतात. मात्र, शहराच्या दोन्ही बाजूला बाहेर रस्त्यावर पोलीस नसल्यामुळे त्या ठिकाणी बेशिस्त वाहन चालक वाहने पुढे घेतात आणि परिणामी वाहतूक कोंडीत भर पडते.







