शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

। चिपळूण । वार्ताहर ।
शाळा बंद असल्याने सर्वाधिक नुकसान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे होत असून रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वाडी वस्त्यांवर क्लासेस घेण्याबाबत धोरण तयार करायला हवे असे मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी आंगवली येथे वह्या वाटप कार्यक्रमात केले.

संगमेश्‍वर तालुक्यातील आंगवली गावात गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेमार्फत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटपावेळी बोलत होते. कोरोना काळातील शासनाच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक धोरणाबाबत नाराजी व्यक्त करत पालकांनी आपल्या मुलांचे शैक्षणिक भविष्य घडविण्यासाठी आता शासनाकडे पाठपुरावा करायला हवा अशी भूमिका मांडली. शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण मोठ्या शैक्षणिक संस्था आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना कदाचित फायद्याचे ठरत असेल, विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जात आहेत. मात्र शहरी भागात पालक सुशिक्षित व जागरूक असल्याने त्यांचे मुलांवर लक्ष असते. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाची बोंब आहे, अनेकांकडे मोबाईल नाहीत. पालकांची आर्थिक स्थिती बेताची आहे अशा विद्यार्थ्यांनी करायचे काय हा प्रश्‍न आहे. ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील मुलांना बसत आहे. शासनाने व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने दुर्गम भागातील वाडी वस्त्यांवर असणारे विद्यार्थी व शाळा यांचा पट लक्षात घेऊन कमी वाडी वस्ती निहाय योग्य ते नियोजन करून जिल्हा परिषद मार्फत क्लासेस सुरू करावेत अशी भूमिका सुहास खंडागळे यांनी यावेळी मांडली. आंगवली गावातील 35 गरजू विद्यार्थ्यांना यावेळी गाव विकास समिती मार्फत मोफत वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी गाव विकास समितीचे सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले, विद्यार्थी संघटनेचे सुनील खंडागळे, महेंद्र घुग यांच्यासह वसंत रेवाले, खांडेकर व स्थानिक ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून सदर छोटेखानी कार्यक्रम पार पडला.

Exit mobile version