आजपासून पहिली-चौथीचे वर्ग होणार सुरू
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोरोना बाधित कमी झाल्यामुळे पहिली ते चौथीचे वर्गही सुरु करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार शाळांमधील सुमारे 75 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अध्यापन 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे. बंद शाळांमधील किलबिलाट सुमारे दोन वर्षांनी सुरु होणार आहे. मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांची संमती अत्यावश्यक करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात 8 वी ते 12 वीचे वर्ग 10 ऑगस्टपासून सुरु करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागात पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु केले. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने बंद असलेल्या पहिली ते चौथीच्या शाळांही सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी कोरोना संसर्गापासून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सोमवारी (ता. 29) याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
त्याची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात केली जाणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गटशिक्षणधिकार्यांना सूचना दिलेल्या आहेत. पालकांच्या बैठका घेऊन शाळा उघडण्यास सांगण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करुन शासनाच्या आदेशाचे काटेकोरपण पालन करावयाचे आहे. तालुकापातळीवर कार्यवाही केली जात आहे. व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने काही जिल्हा परिषद शाळांच्या कामकाजाला आरंभ झाला आहे.