नागरिकांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष, पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी
| महाड । प्रतिनिधी ।
महाड नगर पालिकेचा कारभार सद्या प्रशासनाच्या ताब्यात असल्याने शहरात विविध विकास कामे ठप्प झाली आहेत, नागरिकांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी करत सोमवारी मुख्याधिकारी कार्यालयावर धडक दिली. गेल्या आठवड्यापासून ठप्प असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. कोथुर्डे धरणातून पाणीपुरवठा केला जातो त्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. शहराच्या बहुतांशी भागांमध्ये पाणीटंचाई असताना देखील नागरिकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य देत संयम दाखवला आहे. मात्र आठ दिवसानंतर देखील पाणीपुरवठा पूर्ववत होत नसल्याने अखेर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हनुमंत जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी कार्यालय गाठले. पाणीपुरवठा का पूर्ववत होत नाही याबाबत जाब विचारून ज्यांच्यामुळे पाणीपुरवठा ठप्प आहे त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी केली.
यावेळी शहरातील विविध समस्यांवर नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला. महामार्ग चौपदरीकरण आणि त्यात बाधित होणारी जलवाहिनी याबाबत नियोजन का केले नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.
महाड शहरात सद्या प्रशासनाचा कारभार असल्याने प्रशासन नागरिकांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संदीप जाधव यांनी केला आहे. गेले काही दिवस शहरात पुन्हा कचरा पडून राहत असल्याचे सांगून शहरात गणेशोत्सवापुर्वी खड्डे भरले जातील असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप खड्डे भरले गेलेले नाहीत यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होते. त्याचप्रमाणे शहरात बांधकाम परवाने देखील मुदतीत दिले जात नाहीत. मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते याला कारणीभूत असलेल्या हातगाड्या, पदपथावर बसणारे विक्रेते आणि मोकाट गुरे यांच्यावर कारवाई होत नसल्याचे नागरिकांमध्ये नाराजी आहे.