लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी


अडीच कोटी नागरिकांना पहिला डोस
दोन्ही डोस घेणार्‍यांची संख्या 50 लाखांवर

I मुंबई I प्रतिनिधी I
राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे, राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून, त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.


लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासून देशात आघाडीवर असून, त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात 2 कोटी 7 हजार 70 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे 50 लाख 8 हजार 476 एवढी आहे.


लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याच्या क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात आतार्यंत 2 कोटी 15 लाख 65 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहेत. तर याबाबतीत तिसर्‍या क्रमांकावर गुजरात हे राज्य आहे. गुजरातमध्ये 1 कोटी 91 लाख 88 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर राजस्थानमध्ये 1 कोटी 84 लाख 76 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

भारतात किती लसीकरण?
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 23.62 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 18-44 वयोगटातील 3.04 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. आतापर्यंत 45 वर्षांवरील 13.29 कोटी व्यक्तींना लसीची पहिला डोस देण्यात आला. देशात जास्त रुग्णसंख्या नोंदवणार्‍या जिल्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे. 28 एप्रिल ते 4 मेदरम्यान ही संख्या 531 वरून 209 झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन 100 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

Exit mobile version