वरिष्ठ न्यायमूर्ती ए .ए. सय्यद यांचे आवाहन
नागोठण्यात विधी सेवा महाशिबीर,मान्यवर उपस्थित
पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
समाजातील दुर्बल व मागास घटकांनी शासन योजनांचा लाभ घेऊन सर्वांगीण प्रगती साधावी असे आवाहन राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष, वरिष्ठ न्यायमूर्ती ए.ए.सय्यद सर यांनी सोमवारी (1 नोव्हेंबर) नागोठणे येथे केले.
रिलायन्स नागोठण्यात राज्यविधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर व शासन योजनांचा महामेळावा व उदघाटन समारंभ आयोजित केला होता. आदिवासी स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविला जात असून पथनाट्याद्वारे वाड्या वस्त्यांवर प्रबोधन व जनजागृती केली जात आहे, या कार्यक्रमाचा प्रयोग यावेळी सादर करण्यात आला. तसेच मतदान जनजागृती वर देखील पथनाट्ये सादर करण्यात आले. यावेळी 61 स्टॉल लावण्यात आले होते, या स्टॉलचे उदघाटन व पाहणी सय्यद यांनी केली. या महामेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी तसेच कायदेविषयक जनजागृती व्हावी, याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच सरकारी कार्यालयांच्या माध्यमातून प्रकारे विविध शासकीय विभागांचे 61 स्टॉल्स लावण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दनेश सुराणा, जिल्हा व सत्र न्यायाधीश वभा इंगळे, न्या.अशोककुमार भिलारे,जि.प.सीईओ डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, विविध शासकीय विभागांचे कार्यालयप्रमुख, तालुका बार कौन्सिलचे अध्यक्ष, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
देशहितासाठी समाजातील सर्वच स्तरांची सर्वांगीण प्रगती होणे आवश्यक आहे. प्रत्येक वंचित घटकास, मागासलेल्या व्यक्तीस त्याच्या अधिकाराची, हक्काची जाणीव होणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे असून यासाठीच तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विधी सेवा प्राधिकरण कार्य करीत आहे. वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रयत्नशील आहेत.
ए.ए.सय्यद, न्यायमूर्ती
जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी सर्व मार्गांनी शेवटच्या माणसापर्यंत त्यांचे हक्क मिळवून द्यायचे आहेत असे सुचित केले. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातून प्रशासनाने वंचितांना विविध शासकीय दाखले देण्यासाठी घेतलेल्या शिबिरांबाबत, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. माझी वसुंधरा या अभियानाच्या जनजागृतीबाबतच्या घडीपत्रिकांचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विविध बार असोसिएशनच्या वतीने न्यायमूर्ती ए.ए.सय्यद यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी केले तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.संदीप स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री.ए.एम.मुजावर आणि दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एस.आर.पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, तहसिलदार सचिन शेजाळ, विविध शासकीय विभागांचे कार्यालयप्रमुख व त्यांचे कर्मचारी, रिलायन्सचे वरिष्ठ अध्यक्ष अविनाश श्रीखंडे,अध्यक्ष शशांक गोयल, उपाध्यक्ष चेतन वाळंज तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज, नागोठणे, वरिष्ठ व्यवस्थापक रमेश धनावडे, अजिंक्य पाटील, श्रीकांत राजहंस त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन यांचे बहुमोल सहकार्य लाभले. मतदार नोंदणी अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते मतदार नोंदणी अभियान जनजागृतीपर भित्तीपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदार नोंदणी आमची जबाबदारी हे पथनाट्यही सादर करण्यात आले.
विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याच्या निमित्ताने येथे आलेल्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी तसेच कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.शीतल जोशी-घुगे व त्यांच्या सहकार्यांनी हे आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिर यशस्वी पार पाडले.
सायकलपटूंचे कौतूक
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व नगरपालिका,नगरपंचायती क्षेत्रात सायकल रॅलीद्वारे माझी वसुंधरा या अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाचा, स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. या सायकल रॅलीमध्ये सहभागी होऊन तब्बल सहाशे किलोमीटरचा प्रवास केलेल्या सायकल फोटोंचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सायकल रॅली करिता उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार दिलीप रायण्णावार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संतोष तावडे, राम जोशी,अनिरुद्ध आठवले, अशोक बसवराज, दत्तात्रय पोद्दार, मकरंद नाईक विपुल शहा, अनंत खाडिलकर, ज्ञानेश्वर वरवडे या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.