। चिरनेर । प्रतिनिधी ।
सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, गावागावात यात्रा उत्सवही सुरू आहेत. मात्र, अवकाळी पावसाने व वादळाने हजेरी लावल्यामुळे मंडप डेकोरेशन वाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मंडप डेकोरेशनचे संचालक सचिन घबाडी यांनी केली आहे.
लग्न सराई असल्यामुळे गावागावात लग्नाचे मंडप उभारले गेले आहेत. साखरपुडा, हळदी आणि विवाह सोहळे जोरात साजरे होत असल्यामुळे सर्वत्र भव्य मंडप सजावट केली जात आहे. मात्र, अवकाळी पावसाचा आणि वादळाचा या विवाह सोहळ्यातील मंडप सजावटीला मोठा फटका बसला असून, मंडप डेकोरेशन वाल्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अचानक ओढावलेल्या अवकाळीच्या संकटाने मंडप डेकोरेशनवाले चक्रावून गेले आहेत. अवकाळी पावसामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी मंडप डेकोरेशनचे संचालक सचिन घबाडी यांनी केले आहे.