डम्पिंग ग्राउंड भागात कचर्याचे ढीग; दुर्गंधीने आरोग्य धोक्यात
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव नगरपंचायतीचा खतनिर्मिती प्रकल्प केवळ कागदोपत्रीच असल्याचे जाणवू लागले आहे. डम्पिंग ग्राऊंड परिसरात वाढत चाललेल्या कचर्याच्या ढिगार्यांनी सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असतानाच माणगाव नगरपंचायत हद्दीत विविध कंपनीतील कामगार वर्ग व तंत्रज्ञही मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे कामगार तालुक्याच्या ठिकाणी रहात असल्याने शहरीकरणावर अधिक ताण पडत आहे. याबरोबरच छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी हि मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पर्यायाने माणगावचे शहरीकरण, नागरिकरण झपाटयाने वाढत असताना या शहरात दैनंदिन निर्माण होणार्या घनकचर्याचा प्रश्नही तितकाच बिकट बनत चालला आहे. माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा घनकचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र या डम्पिंग ग्राउंड भागात हा कचरा ठिकठिकाणी टाकल्याने तो परिसरात पसरत असून या भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे जनावरे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. माणगाव नगरपंचायतीचा खत निर्मिती प्रकल्प कागदावरच राहिल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्हच उभारले आहे.
मागील नगरपंचायत बॉडीने हा कचरा उचलण्यासाठी टेंडर काढून एका ठेकेदाराला हे काम दिले होते. हा कचरा एका ठेकेदारामार्फत उचलून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात होता. या कचर्याचे वर्गीकरण करून त्या कचर्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याचे प्रयोजन त्यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीची नगरपंचायतीवरील सत्ता जावून शिवसेनेकडे ही नगरपंचायत आली. त्यानंतर ही नगरपंचायत आपल्या कार्यकाळात या कचर्याचे वर्गीकरण करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून खत निर्मिती प्रकल्प राबवील अशी आशा नागरिकांना होती. मात्र नगरपंचायतीकडून बाजारपेठेतील उचललेला कचरा डम्पिंग ग्राउंडच्या खड्डया बाहेर पसरला आहे. तसेच या परिसरात ठिकठिकाणी कचर्याचे ढीग असल्याने तो अन्यत्र हवेने तसेच गुरांढोरा मुळे पसरून परिसरात रोगाची साथ येण्याची शक्यता असून नागरिकांचे तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. यासाठी माणगाव नगरपंचायत या डम्पिंग ग्राउंडवर कचर्याचे वर्गीकरण करून खत निर्मिती करण्यासाठी कधी पाऊल टाकणार असा सवाल नागरीकातून उपस्थित होत आहे.
स्वच्छ, सुंदर केवळ नावापुरते
नगरपंचायतीपुढे खतनिर्मिती प्रकल्पासाठी नवीन आव्हान उभारले आहे. या घनकचर्याचे व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून त्याची विल्हेवाट लावून या दैनंदिन गोळा केलेल्या कचर्यापासून खत निर्मिती करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकावे. अशी नागरीकातून मागणी होत आहे. या गंभीर व महत्वाच्या प्रश्नात नगरपंचायतीने लक्ष देणे अपेक्षित आहे. त्यामुळे माणगावात डंपिंग ग्राउंडवर कचर्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे माणगाव स्वच्छ व सुंदर कधी होणार? हा प्रश्नच आहे.
माणगाव नगरपंचायतीच्या मागील राष्ट्रवादी काँ. पक्षाच्या बॉडीने ई-टेंडर द्वारे कचरा उचलण्याचे काम एका ठेकेदाराला दिले होते. त्या ठेकेदारा मार्फत कर्मचारी नेमून हा कचरा गोळा केला जात होता. तसेच या कचर्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने या कचर्याचे वर्गीकरण सुका, ओला, व प्लास्टिक व बाटल्या बाजूला करून माणगाव येथील नगरपंचायतीच्या जागेतील पाच एकर असणार्या डंपिग ग्राउंडवर विल्हेवाट लावून खत निर्मिती करावयाचे प्रयोजन होते. माणगाव नगर पंचायतीला डंपिग ग्राउंडच्या जागेची भेडसावणारी समस्या शासनाने सोडवली. त्यानुसार शासनाची पाच एकर जागा नगरपंचायतीला उपलब्ध झाली. असल्याचे समजते. मात्र हा कचरा उघड्यावर टाकल्याने कचर्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून खतनिर्मिती प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभारले आहे.