। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुका चिटणीसपदी युवानेते रमेश मोरे यांची सलग नव्यांदा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले आहे.
माणगाव तालुक्यात ज्ञानदेव पवार, अनिल नवगणे हे शेकापक्ष सोडून गेल्यावर तालुक्यात शेकापक्ष पूर्णपणे ढासळला होता. तालुक्यात पक्षाला उभारी देण्यासाठी तरुण अशा खंबीर नेतृत्वाची पक्षाला गरज होती. तालुक्यातील मोर्बा येथील पक्षाचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत यांनी रमेश मोरे यांची समाजासाठी असणारी काम करण्याची तळमळ पाहून त्यांना शेकापक्षात घेतले. त्यानंतर पक्षश्रेष्ठी आ. जयंतभाई पाटील यांनी रमेश मोरे यांची सन 2014 साली पहिल्यांदा माणगाव तालुका चिटणीसपदी नियुक्ती केली.
यानंतर रमेश मोरे यांनी तालुक्यात पक्षसंघटना आपल्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिकतम मजबूत करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, सदस्य निवडून आणण्यात तालुका चिटणीस या नात्याने रमेश मोरे यशस्वी झाले. शेकापचा कोणताही कार्यक्रम असो अथवा पक्षश्रेष्ठीचा दौरा असो, अशी विविध कामे यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रमेश मोरे यांचे विशेष प्रयत्न असतात. तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात ते यशस्वी झाले आहेत. मागील 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना मोर्बा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याची संधी देण्यात आली होती. परंतु, याठिकाणी महिला आरक्षण असल्याने त्यांच्या पत्नी आरती मोरे यांना या गटातून संधी मिळाली.
या गटातून भरघोस मतांनी आरती मोरे जिल्हा परिषदेवर निवडूण आल्या.त्यानंतर मोर्बा जिल्हा परिषद गटात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात रमेश मोरे यशस्वी झाले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच विविध पक्षातील मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या या निवडीबद्दल प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना रमेश मोरे म्हणाले की, शेकापचे सर्वेसर्वा तथा सरचिटणीस आ. जयंर्त पाटील यांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून माझी माणगाव तालुका चिटणीसपदी नियुक्ती करून मला जनसेवा करण्याची व विकासकामे करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे तसेच पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळींचे आभार व्यक्त करतो. आतापर्यंत केलेल्या कामाच्या दुप्पट काम करून मी जास्तीत जास्त तालुक्यातील ज्येष्ठांना, तरुणांना, महिलांना एकत्र आणून प्रत्येक गावागावात जाऊन शेकापचा लालबावटा फडकवण्याचा प्रयत्न करेन.