स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्याचे नगरपंचायतीपुढे आव्हान
। माणगाव । प्रतिनिधी ।
तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणाचा शहरीकरणावर जसा परिणाम होत आहे, तसे नागरीकरणही झपाट्याने वाढत आहे. कित्येक वर्षांची माणगाव ग्रामपंचायत अस्तिवात असताना झालेली पाणीयोजना आजही ती कार्यान्वित आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊन सात वर्षे लोटली तरीही तीच जुनी पाणीपुरवठा योजना अस्तिवात आहे. वास्तविक, या पाणीपुरवठा योजनेचा विस्तार होणे गरजेचे होते. मात्र, जुनी पाणीयोजना कमी पडू लागल्याने अनेक भागात पाण्याच्या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. माणगाव नगरपंचायतीने नवीन पाणीपुरवठा योजना हाती घेऊन नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे माणगावकर स्वच्छ व मुबलक नवीन पाणीपुरवठा योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे माणगाव नगरपंचायतीपुढे नव्या पाणीपुरवठा योजनेचे आव्हान उभारले आहे.
माणगाव नगरपंचायतीमध्ये खांदाड, माणगाव, भादाव, नाणोरे उतेखोल अशा पाच गावांचा समावेश झालेला आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये कार्यान्वित असलेली नळपाणीपुरवठा योजना जुनी असून, या योजनेतून नगरपंचायत हद्दीमध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अस्तिवात असलेला पाणीपुरवठा योजनेमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेला असला तरी त्या पाणीपुरवठा योजनेचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना कमी पडत आहे. परंतु आज पर्यत ग्रामीण भागात प्रति माणसी प्रति दिन 55 लिटर प्रमाणेच शहरामध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर काही भागात तेही पाणी अपुरे पडत आहे. तर काही ठिकाणी पाणी पोहोचत नाही. नगरपंचायतीचे नागरी क्षेत्रामधे शासनाचे पाणीपुरवठा वितरणाचे निकषांनुसार, प्रति माणसी प्रति दिन 75 लीटर पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. माणगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉ. पक्षाची सत्ता असताना त्यांनी ता. 22 जानेवारी 2021 रोजी पालकमंत्री आदिती तटकरे यांना लेखी निवेदनातून नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी निधीची मागणी केली होती. मात्र, हा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला. सध्या शिवसेनेच्या ताब्यात नगरपंचायत असून, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माणगावच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावू तसेच शहरातील गटारातून काळ नदीला जाणार्या सांडपाण्याच्या निचर्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करून काळ नदी प्रदूषण मुक्त करू अशी ग्वाही दिली होती. ही दोन्ही आव्हाने नगरपंचायतीपुढे उभी आहेत, नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 7 कोटी रुपये अपेक्षित असून एवढा पुरेसा निधी नगरपंचायतीकडे नाही. पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध झाल्यास माणगावचा कायमचा पाणी प्रश्न निकाली निघेल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे.
…तरच पाणीप्रश्न निकाली निघेल
माणगाव शहराची सन 2011 चे जनगणनेनुसार लोकसंख्या 18,740 इतकी असून, मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झपाट्याने वाढलेले आहे. सध्या माणगाव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 4 पाणी साठवण टाकी असून, काळ नदीवर उभारण्यात आलेल्या जॅकवेलमधून साठवण टाकीत पाणी सोडून शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यानंतर शहराला पाणीपुरवठा केला जातो. दररोज सुमारे 25 लाख लीटर पाणी दिले जाते. वाढत्या नागरीकरणामुळे शहरामध्ये पाणीपुरवठा करणेकामी अस्तिवात वितरण व्यवस्था अपुरी पडत आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीतील माणगाव, खांदाड, मुंबई गोवा हायवे महामार्गाचा राठोड हॉस्पिटलपर्यंतचा परिसर (पूर्व भाग) व, उतेखोल, भादाव नाणोरे (पश्चिम भाग) अशा दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्यास शहरातील पाणीपुरवठ्याबाबतची भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा निकाली निघेल