| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपने बहुमत मिळविले. परंतु, प्रभाग 14 मध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रभाग क्रमांक 14 हा भाजपसाठी पूर्वी मजबूत मानला जाणारा भाग होता. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून भाजपला तीन जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळीही विजय निश्चित मानला जात होता. मात्र, निकाल लागल्यानंतर चारही उमेदवार कमी फरकाने पराभूत झाल्याने पक्ष नेतृत्वाने या निकालाकडे केवळ पराभव म्हणून न पाहता, त्यामागील अंतर्गत कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. स्थानिक पातळीवर प्रचार झाला असला, तरी अपेक्षित एकजूट दिसली नाही, काही भागात अधिकृत उमेदवारांना संघटनात्मक पाठबळ कमी पडले, तर काही ठिकाणी विरोधकांना अप्रत्यक्ष मदत झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले.
या निवडणुकीत भाजपने प्रभाग 14 मध्ये नव्या चेहऱ्यांवर मोठा विश्वास दाखवला होता. सतीश दत्तात्रेय पाटील, इकबाल हुसेन काझी, रेणुका मयुरेश नेतकर या तिन्ही नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली. याशिवाय नव्याने भाजपमध्ये आलेल्या सारिका अतुल भगत यांनाही पक्षाने उमेदवारी दिली. परंतु, त्या तिघांनाही पराभव स्वीकारावा लागला होता.
निवडणुकीनंतर सर्वाधिक गंभीर आरोप मनोहर म्हात्रे आणि मुकित काझी या दोन माजी नगरसेवकांवर झाले. स्थानिक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करताना आरोप केला की, या दोघांनी अधिकृत उमेदवारांसाठी अपेक्षित काम केले नाही. काही भागात विरोधी उमेदवारांच्या संपर्कात राहून अप्रत्यक्ष मदत केल्याचेही सांगण्यात आले. या तक्रारीनंतर जिल्हा भाजपने अंतर्गत पडताळणी सुरू केली. मतदान केंद्रनिहाय आकडे, पदाधिकाऱ्यांचे अहवाल आणि उमेदवारांची निवेदने तपासण्यात आली. त्यानंतर दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दोघांनाही सहा वर्षांसाठी निलंबित केले. प्रभाग 14 मधून निवडणूक लढवलेल्या भाजप उमेदवारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे का करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
निष्ठेची हीच शिक्षा? मनोहर म्हात्रे यांचा सवाल
पक्षासाठी आयुष्य घातलं, जनतेसाठी रात्रंदिवस झटलो आणि आज माझ्यावरच अन्याय?अशा शब्दांत माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी आपल्या मनातील वेदना व्यक्त करत पक्षाच्या कारवाईवर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. निलंबनानंतर अखेर त्यांनी मौन तोडत आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यकर्त्यांसमोर आणि जनतेसमोर मन मोकळं केलं.
म्हात्रे म्हणाले, ही कारवाई केवळ अन्यायकारक नाही, तर माझ्या निष्ठेचा अपमान आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना, केवळ ऐकीव माहितीवर आणि राजकीय आकसातून आपल्यावर निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणुकीच्या काळातील अनुपस्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, 3 जानेवारीला मोठ्या बहिणीचं निधन झालं. घरात दुःखाचा डोंगर कोसळला होता. 13 जानेवारीपर्यंत सर्व विधींसाठी नाशिकला राहावं लागलं. त्या काळातही पक्षाचा विचार करत होतो. पण माझ्या दुःखाची कुणालाही किंमत वाटली नाही. सलग तीन वेळा निवडून येऊनही उमेदवारी नाकारली गेली. तरीही आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो, आदेशांचे पालन केले. कधीच पक्षविरोधात गेलो नाही मग माझी चूक नेमकी काय? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रभाग 14 मधील पराभवाबाबत बोलताना त्यांनी काही अंतर्गत घडामोडींवरही प्रकाश टाकला. निष्ठावान कार्यकर्त्यांना दूर सारलं गेलं, बाहेरच्या लोकांना पुढे आणलं. त्यामुळेच मतदार नाराज झाला, असे त्यांनी सांगितले.
आपल्या कामाचा वापर प्रचारासाठी करण्यात आला, मात्र स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याची वेदना व्यक्त करताना ते म्हणाले, माझं काम वापरलं, पण माझं अस्तित्वच पुसलं ही वेदना शब्दांत सांगता येणार नाही. दरम्यान, त्यांच्या समर्थनार्थ प्रभाग 14 आणि नेरे परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनाम्यांची तयारी सुरू केली असून, वातावरणात तीव्र नाराजी आहे. ज्यांनी खरंच पक्षाशी गद्दारी केली, त्यांच्यावर कारवाई नाही आणि आमच्यासारख्या निष्ठावान लोकांना शिक्षा, अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
